हिंदी चित्रपटसृष्टीत अल्पावधीत गुणवत्तेच्या जोरावर लोकप्रियता मिळवूनही आत्महत्या करून जीवन संपवलेल्या सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूच्या विषयाचा दि एन्ड होण्याची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. मुंबईतील आपल्या राहत्या घरात सुशांतने फाशी घेऊन आत्महत्या केली त्याला दोन महिने होऊन गेले, अद्यापही या प्रकरणाची चौकशी सुरूच असून या विषयाला आता राजकारणानेही वेढा घातला आहे.
सुशांत सिंगच्या आत्महत्येला जबाबदार कोण, या प्रश्नाचे उत्तर शोधणे महत्त्वाचे असले तरी या उत्तराचा शोध घेताना त्यामध्ये जे राजकारण केले जात आहे, हे निश्चितच भूषणावह नाही. सुशांत सिंगची जन्मभूमी असलेले बिहार राज्य आणि त्याची कर्मभूमी असलेली मुंबई म्हणजे महाराष्ट्र राज्य या दोन राज्यांच्या पोलिसांमध्ये आता संघर्ष निर्माण झाला असून त्यामुळे आपोआपच दोन्ही राज्यातील राजकारणी नेते सक्रिय झाले आहेत.
बिहारमध्ये येत्या काही महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार असल्याने अशाप्रकारचा हॉट आणि हाय प्रोफाइल विषय तेथील राजकारणी सोडून देतील, अशी शक्यताच नाही. पण या राजकारणामुळे सत्यापर्यंत पोहोचण्यास विलंब लागला किंवा अडचणी निर्माण झाल्या तर त्याला जबाबदार कोण, याचाही विचार होण्याची गरज आहे. गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये सुशांत सिंगच्या आत्महत्येच्या कारणांबाबत विविध प्रकारच्या थियरीज मांडण्यात येत आहेत.
सुशांत सिंगच्या संदर्भात त्याचे नातेवाईक आणि मित्र वेगवेगळी भूमिका मांडून हा गोंधळ अधिकच वाढवत आहेत. सुशांत सिंगने नैराश्यातूनच आपले जीवन संपवले, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याला हे नैराश्य कशामुळे आले एवढेच शोधण्याची गरज होती, पण यानिमित्ताने हिंदी चित्रपट सृष्टीतील घराणेशाही आणि कंपूशाही या विषयावर चर्चा झाली.
महेश भट्ट, करण जोहर, भन्साळी यासारखे मोठे निर्माते-दिग्दर्शक यांचीही चौकशी झाली. खरे तर मुंबई पोलीस आपल्या पातळीवर योग्य प्रकारे तपास करत असतानाच बिहार पोलिसांनी विनाकारणच या तपासामध्ये उडी घेतल्याने बिहार पोलिसांचा तपास होईपर्यंत आपण तपास करणार नाही, अशी भूमिका मुंबई पोलिसांना घ्यावी लागली होती.
सुशांत सिंगच्या मृत्यूला त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती जबाबदार आहे, अशी थेट तक्रार सुशांत सिंगच्या वडिलांनी बिहार पोलिसांमध्ये दाखल केल्याने बिहार पोलिसांनी रिया चक्रवर्तीची चौकशी करण्याच्या निमित्ताने या तपासात उडी घेतली. नंतर मुंबई पोलीस बिहार पोलिसांना सहकार्य करत नाहीत, अशी टीका बिहारमधील भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केल्याने राजकारणाला वेग आला.
महाराष्ट्र सरकारचे बॉलीवूडशी लागेबांधे असल्यानेच या प्रकरणाची चौकशी गांभीर्याने होणार नाही, असेही बिहारमधील नेत्यांनी सूचित केले. खरे तर गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीमध्ये मुंबई पोलिसांनी केलेला तपास पाहता या तपासापासून कोणाला जाणीवपूर्वक बाजूला ठेवले आहे, असे म्हणता येत नाही.
तरीही या प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करावी, अशा मागणीनेही मध्यंतरी जोर धरला होता. जेव्हा एखाद्या राज्याच्या पोलिसांच्या तपासाबाबत शंका निर्माण होते किंवा एखाद्या गुन्ह्यामध्ये दोन पेक्षा जास्त राज्यांचा सहभाग असतो तेव्हाच सर्वसाधारणपणे सीबीआय चौकशीची मागणी केली जाते; पण मुंबई पोलीस व्यवस्थित तपास करत असतानाही सीबीआय चौकशीची मागणी करण्यामागेही राजकारणच आहे.
माध्यमांमध्ये सुशांत सिंग आत्महत्येबाबत विविध प्रकारच्या थियरीज मांडल्या जात असल्यामुळेही गोंधळ वाढण्याचे काम होत आहे आणि राजकारण या गोंधळाला अधिकच गुंतागुंतीचा करून टाकत आहेत. अर्थात, या सर्व विषयांमध्ये राजकारण असले तरी सुशांत सिंगच्या आत्महत्येमागील सत्य समोर येणे गरजेचे आहे.
सुशांतने आत्महत्या करण्यापूर्वी काही दिवस आधीच त्याची सेक्रेटरी दिशा सेलियननेही आत्महत्या केली होती. दिशाने आत्महत्या केल्यानंतर सुशांतने आपल्या एका मित्राकडे प्रतिक्रिया व्यक्त करताना “आता ते लोक मलाही सोडणार नाहीत’, अशी भीती व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. सुशांतच्या बॅंक खात्यांमधील पैसेही गायब झाल्याची बातमी मध्यंतरी आली होती. या सर्वच बाबींचा तपास करून सत्यापर्यंत पोहोचण्याची गरज आहे.
सुशांतने आत्महत्या केली नसून त्याचा खून झाला असून या दिशेने तपास करावा, अशी सूचना वादग्रस्त नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे, याचाही विचार करावा लागणार आहे. हिंदी चित्रपट सृष्टीतील घराणेशाही आणि कंपूशाही यामुळे सुशांतच्या करिअरमध्ये काही अडथळे निर्माण झाल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या केली, असे प्रथम दर्शनी सांगण्यात येत होते; पण मुंबई पोलिसांनी ज्या ज्येष्ठ निर्माता-दिग्दर्शकांची चौकशी केली त्यामधून तशी कोणत्याही प्रकारची बाब समोर आली नाही. पण या निमित्ताने कंगना राणावत सारख्या बोलघेवड्या अभिनेत्रींनी घराणेशाही आणि कंपूशाहीवर तोंडसुख घेतले. त्यामागेही बॉलीवूडमधील राजकारण दिसून येते. एखाद्या आत्महत्येनंतर एवढ्या प्रकारचे राजकारण होण्याची ही पहिलीच घटना असावी.
देशाच्या आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. शेकडो बेरोजगारांनी आपले जीवन संपवले आहे. घरगुती हिंसाचार आणि त्रासाला कंटाळून अनेक विवाहित महिलांनी आत्महत्या केल्या आहेत. या सर्व आत्महत्यांवर आजवर जेवढी चर्चा झाली नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त चर्चा सुशांत सिंगच्या आत्महत्येवर होत आहे, हे विशेष.
बिहारमध्ये विधानसभेची निवडणूक लवकरच होणार असल्याने या राजकारणाला विशेष रंग चढला आहे, हेही नाकारून चालणार नाही. यानिमित्ताने मराठी साहित्यामध्ये लोकप्रिय असलेली “प्रेताच्या टाळूवरील लोणी खाण्याची वृत्ती’ ही म्हण आठवल्याशिवाय राहत नाही.
सुशांत सिंगच्या आत्महत्येमागील कारणे शोधणे महत्त्वाचेच आहे, पण त्यासाठी तपासामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण येणे योग्य ठरणार नाही. आत्महत्येची घटना मुंबई शहरात घडली असल्याने तपासाचा पहिला अधिकार मुंबई पोलिसांचाच आहे, हे मान्य करूनच या विषयाकडे पाहावे लागेल. बिहारमधील राजकीय नेत्यांना या विषयाच्या सत्यापर्यंत पोहोचायचे असेल तर त्यांनी राजकारण बाजूला ठेवणे हिताचे ठरेल.