तातडीने शक्तिपरीक्षा घेण्याची भाजपची मागणी
भोपाळ : राजकीय अनिश्चिततेच्या गर्तेत सापडलेल्या मध्यप्रदेशातील हालचालींना वेग आला आहे. विधानसभेचे सभापती एन.पी.प्रजापती यांनी शनिवारी सत्तारूढ कॉंग्रेसच्या सहा बंडखोर आमदारांचे राजीनामे स्वीकारले. राजीनामे मंजूर झालेल्यांमध्ये एक दिवस आधीच मंत्रिपद गमावलेल्यांचा समावेश आहे.
प्रभावी तरूण नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी नुकताच कॉंग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे समर्थक असणाऱ्या कॉंग्रेसच्या 22 आमदारांनी राजीनामे देत बंड पुकारले. त्यामुळे मध्यप्रदेशातील कॉंग्रेस सरकारचे अस्तित्व धोक्यात आले आहे. तर त्या राज्याची सत्ता पुन्हा काबीज करण्याबाबत भाजपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मागील काही दिवसांतील घडामोडींमुळे त्या राज्यात राजकीय सस्पेन्स निर्माण झाला आहे. बंड मोडून काढण्यासाठी कॉंग्रेस आणि मुख्यमंत्री कमल नाथ सरसावले आहेत. त्यातून आमदारकीचा राजीनामा देणाऱ्या सहा मंत्र्यांना शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळातून हटवण्यात आले. त्यापाठोपाठ त्यांच्या आमदारकीचे राजीनामेही स्वीकारण्यात आले. इतर बंडखोर आमदारांवर दबाव टाकण्यासाठी ते पाऊल उचलण्यात आल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपाल लालजी टंडन यांची भेट घेतली. कॉंग्रेस आमदारांच्या राजीनाम्यामुळे मध्यप्रदेश सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे विधानसभेत शक्तिपरीक्षा घेतली जावी, अशी मागणी शिष्टमंडळाने त्या भेटीत केली. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू होणार आहे. सरकार अल्पमतात आल्याने त्या अधिवेशनाला काहीच अर्थ नाही. त्यामुळे उद्याच (रविवार) शक्तिपरीक्षा घ्यावी. ती आवाजी मतदानाने नव्हे; तर मत विभाजनाद्वारे व्हावी, अशी आग्रही भूमिकाही भाजपकडून घेण्यात आली आहे.