विरोधक आणि भाजपमध्ये रंगले शाब्दिक युद्ध
नवी दिल्ली : स्थलांतरित मजुरांच्या घरवापसीवरून सोमवारी जोरदार राजकीय चिखलफेक झाली. रेल्वे भाड्याच्या मुद्द्य्ावरून विरोधी पक्ष आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध रंगले. लॉकडाऊनमुळे अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना स्वगृही पाठवण्यासाठी विशेष रेल्वेगाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, पैशांची चणचण जाणवणाऱ्या मजुरांना रेल्वे प्रवास परवडत नसल्याचे वृत्त आहे. त्यावरून कॉंग्रेस, माकप, नॅशनल कॉन्फरन्स आणि लोकतांत्रिक जनता दल या पक्षांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.
कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी तर स्थलांतरित मजुरांचे रेल्वे भाडे त्यांचा पक्ष भरेल, अशी घोषणा केली. सोनियांप्रमाणेच कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली. एकीकडे रेल्वे मजुरांकडून तिकिटांची रक्कम वसूल करत आहे. तर दुसरीकडे रेल्वे मंत्रालय पीएम-केअर्स फंडात 151 कोटी रूपयांची देणगी जमा करत आहे. हे कोडे सोडवा, अशी तिरकस टिप्पणी राहुल यांनी ट्विटरवरून केली.
विरोधकांच्या टीकेला भाजपकडून प्रत्युत्तर देण्यात आले. स्थलांतरित मजुरांच्या प्रवासासाठी कुठल्याही रेल्वे स्थानकावर तिकिट विक्री होणार नसल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने आधीच स्पष्ट केले आहे. तिकिटांची बहुतांश रक्कम रेल्वेकडून अनुदानित आहे. राज्य सरकारांना थोडाच भार उचलावा लागणार आहे, असे भाजपने म्हटले. कुठलेही तारतम्य न बाळगता मजुरांचा प्रवास घडवल्याने इटलीसारखा करोनाचा वेगाने फैलाव होईल. सोनियांची तशी इच्छा आहे का, असा सवालही भाजपकडून करण्यात आला.