नवी दिल्ली– मागील आठ दिवसापासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय नाट्याचा अंत पुढील आठवड्यात होणार असल्याची चर्चा दिल्लीत सुरू आहे. यामुळे महाराष्ट्रात सत्तांतर होणार की नाही? आणि झाले तर ते कशाप्रकारे होणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांच्याशी राज्यातील राजकीय घडामोडीवर चर्चा केली. उभय नेत्यामधील अर्ध्या तासाच्या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील कळू शकला नाही. परंतू, पुढील आठवड्यात महाराष्ट्रात मोठी राजकीय खेळी खेळली जाणार असल्याचे सूत्रचे सांगितले.
तिकडे, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी गुवाहाटीतील सर्व आमदारांसह मुंबईत येणार असल्याचे म्हटले आहे. मुंबईत येताच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेऊ असेही शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. अलीकडेच गुजरातच्या वडोदामध्ये फडणवीस आणि शिंदे यांची गुप्त बैठक झाल्याची चर्चा होती. यानंतर फडणवीस यांनी दिल्ली गाठल्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिंदे यांनी अलिकडेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून समर्थन परत घेत असल्याचे म्हटले होते.
भारतीय जनता पक्षाने राज्यातील घडामोड ही शिवसेनेतील अंतर्गत बाब आहे असे सांगून हात झटकले आहेत. राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्र सरकारने मागच्या आठवड्यात घेतलेल्या निर्णयाची माहिती मागविली आहे. राज्यपालांचे मुख्य सचिव संतोषकुमार यांनी राज्याचे मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांना पत्र लिहून 22, 23 आणि 24 जून रोजी काढलेले जीआर, सर्क्युलरची माहिती मागणारे पत्र लिहिले आहे.
एकंदरीत, मुंबई, गुवाहाटी आणि दिल्लीत राजकीय वारे जोमात वाहू लागले आहेत. भाजपा शिंदे यांना सोबत घेऊन महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्याचा दावा करू शकते. महत्वाचे म्हणजे फडणवीस यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदे हे सुद्धा दिल्लीत आले असल्याची चर्चा ऐकायला येत होती.