मुंबई: मुंबईतील ५५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोलिस कर्मचाऱ्यांनी दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपत नाही. तोपर्यंत पोलिस ठाण्यात येण्याची आवश्यकता नाही. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी सर्व ९४ पोलिस ठाण्यांना या संदर्भातील आदेश दिले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार आहे. पण मुंबईतील कोरोना विषाणूबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता या लॉकडाऊनच्या कालावधीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
मुंबईत आतापर्यंत कोरोनाची लागण झाल्यामुळे तीन पोलिसांचा मृत्यू झाला आहे. तर ५५ पोलिस कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर परमबीर सिंह यांनी हे आदेश काढले आहेत.
पोलिस आयुक्तांनी काढलेल्या आदेशात असेही म्हटले आहे की, मुंबई पोलिस दलातील ५० पेक्षा जास्त वयाच्या आणि उच्च रक्तदाब, मधुमेह आणि इतर कोणताही आजार असलेल्या कर्मचाऱ्यांनी सध्या सुटी घ्यायलाही हरकत नाही. ५० पेक्षा जास्त वयोगटातील लोकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता सर्वाधिक असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेही हा निर्णय पोलिस आयुक्तांनी घेतला आहे.