पुणे – जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या रोखण्यात अपयश येत असल्याने राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय आणि पोलीस दलातील अधिकाऱ्यांना शुक्रवारी चांगलेच खडसावले. रागातच त्यांनी “मुंबईत करोनाची संख्या नियंत्रणात येते; पण, पुण्यात का नाही,’ असा सवाल अधिकाऱ्यांना केला. परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दांत त्यांनी अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. यानंतर खडबडून जाग्या झालेल्या पोलीस यंत्रणेने प्रवास आणि घरगुती कार्यक्रमांवर बंधणे घालण्याचे शुक्रवार रात्री जाहीर केले. तसेच, नियमांचे उल्लंघन गेल्यास कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, असे आदेशही काढले आहेत.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता. मात्र, तरीही परिस्थिती नियंत्रणात येत नसल्याचे चित्र आहे. यामुळे अजित पवार आठवड्यातील किमान चार दिवस पुण्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. मात्र, तरीही करोनाबाधित रुग्ण वाढत आहेत. यामुळे त्यांनी प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांची कानउघडणी केली.”रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करा आणि परिस्थिती नियंत्रणात आणा. पुन्हा एकदा हे सांगतो, आता परत सांगणार नाही. परिस्थिती आटोक्यात आली नाही, तर परिणाम भोगावे लागतील,’ अशी तंबी पवार यांनी अधिकाऱ्यांना दिली होती. यानंतर रातोरात पुणे पोलिसांनी काही आदेश काढले. त्यांची अंमलबजावणीही शनिवारपासून ठिकठिकाणी होताना दिसत आहे.
मोटारीत तिघांनाच मुभा-आयुक्त
रिक्षा, टॅक्सी आणि मोटारीमधून चालकासह फक्त तीन जणांनाच प्रवासाची परवानगी आहे. कोणत्याही कार्यक्रमासाठी 50 पेक्षा जास्त व्यक्ती जमविण्यास मनाई आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांनी दिली आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर नागरिक बाहेर पडत आहेत. रस्त्यावर गर्दी वाढते आहे. त्यामुळे रुग्णसंख्या वाढतआहे. त्यापार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलत पुन्हा एकदा रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी वाहनांसाठी नियम लागू केले आहेत. त्यानुसार शहरात आता रिक्षा, टॅक्सी आणि चारचाकी वाहनातून प्रवास करताना ड्रायव्हरसह तीन व्यक्तींना प्रवास करता येणार आहे.
…नक्की करायचे काय?
सध्या आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू आहे. त्यानुसार सर्व अधिकार विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना आहेत. त्यांच्या सूचनेनुसारच पोलीस जमावबंदी आणि संचारबंदीचे आदेश लागू करते. मध्यंतरी हे आदेश लागू असताना पोलिसांनी दिवस-रात्र रस्त्यावर खडा पहारा देत तसेच नागरिकांचा रोष पत्करत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. मात्र, लॉकडाऊनची बंधने हळूहळू शिथिल करण्याचे आदेश देत पोलिसांना रस्त्यावरील बंदोबस्त, बॅरिकेट आणि तपासणी नाके हटवण्यास सांगण्यात आले. आता, तर मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईचा अधिकार महापालिकेचाच आहे.
यामुळे सातत्याने वेगवेगळ्या प्रकारचे आदेश प्रशासनाकडून मिळत असल्याने नक्की करायचे काय? असा प्रश्न पोलीस प्रशासनापुढे पडला आहे.