तेजस्वी सातपुते : शांतता कमिटी बैठक
कराड (प्रतिनिधी) – सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच राहणार असून येणाऱ्या काळात कोणाकडून अफवा पसरविण्याचा प्रयत्न झालाच तर पोलिसांकडून त्याला कठोर शासन केले जाईल. अशा समाजकंटकांची नावे नागरिकांनी पोलिसांना कळवावीत. असे आवाहन पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते यांनी केले.
कराड शहर व कराड ग्रामीण पोलिसांतर्फे आयोजीत कराड तालुका शांतता कमिटीची बैठक पोलीस अधीक्षक सातपुते यांच्या अध्यक्षतेखाली कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात पार पडली. यावेळी त्या बोलत होत्या. पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांची प्रमुख उपस्थिती होती.
सातपुते म्हणाल्या, कराड शहराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. गेल्या काही वर्षात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश याच शहराने सर्वदूरपर्यंत दिला आहे. हिंदू मुस्लिम येथे आपआपले धार्मिक सण एकमेकांच्या सहभागाने मोठ्या उत्साहाने आणि शांततेत साजरे करत असतात. हे सामाजिक ऐक्य कराडकरांनी अबाधित ठेवावे. सोशल मीडियावर पोलिसांचा वॉच राहणार असून येणाऱ्या काळात कोणाकडून अफवा पसरविण्याचा प्रयत्न झालाच तर पोलिसांकडून त्याला कठोर शासन केले जाईल. अशा समाजकंटकांची नावे नागरिकांनी पोलीस अधिकाऱ्यांना कळवावीत. तात्काळ कारवाई केली जाईल.
यावेळी पोलीस उपअधिक्षक सूरज गुरव यांनी कराडची शहराची शांतताप्रिय म्हणून असलेली ओळख कायम ठेवण्यासाठी येणाऱ्या काळात सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी, सर्वधर्मीय नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष अल्ताफ शिकलगार, फारूख पटवेकर, मझहर कागदी, नगरसेवक सौरभ पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, शिवसेनेचे नितीन काशिद, मनसेचे दादा शिंगण, सागर बर्गे, आरपीआयचे आप्पासाहेब गायकवाड, दत्ता पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी, शांतता कमिटीचे सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक व आभार पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांनी मानले.