ओन्ली ऍडमिन कॅन सेंड मेसेज; व्हॉट्सऍप युजर्स अलर्ट
नगर, (प्रतिनिधी) – अयोध्या निकालानंतर सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारची अफवा पसरून धार्मिक तेढ निर्माण करू नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल, अशी पोलिसांनी नोटीस काढल्यानंतर ग्रुप ऍडमिन सजग झाले. व्हॉट्सऍप ग्रुप ऍडमिन यांनी आपल्या व्हॉट्सऍपग्रुपची आधीची व्हॉट्सऍप सेंटिंग बदलवून ओन्ली ऍडमिन कॅन सेंड मेसेज, अशी सेंटिंग करून ग्रुपवर कुठलाही धार्मिक द्वेष पसरवणारी पोस्ट येऊ नये, म्हणून दक्षता घेतली.
बॉयकॉट मीडिया या व्हॉट्सऍप ग्रुपच्या ऍडमिन यांनी ग्रुप सर्वांसाठी चर्चेला खुला ठेवून, फक्त इतरांच्या भावनांना ठेच लागेल, असे काही लिहू नये असे सांगितले. त्यांच्या या भूमिकेसंदर्भात त्यांच्याशी बोललो असता त्यांनी सांगितले,
सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय मान्य आहे. केवळ पोलीस प्रशासनाने काढलेला आदेश हा गळचेपी करणारा वाटतो. माझ्या ग्रुपमधील सदस्यांवर माझा विश्वास आहे, त्यामुळे मी ग्रुप चर्चेसाठी खुला ठेवला. मात्र, धार्मिक पोस्ट टाकून कुणाच्या भावनांना ठेच लागणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन बॉयकोट मीडिया या ग्रुपचे ऍडमिन डॉ. प्रा. बापू चंदनशिवे यांनी केले होते.
आपल्या भूमिकेविषयी बोलतांना ते म्हणाले, धार्मिक द्वेष पसरणार नाही, याची एक दिवसच का काळजी घ्यायची, खरंतर कधीच धार्मिक द्वेष पसरवल्या जाणार नाही, याची कायम काळजी घेतली पाहिजे, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या भूमिकेच्या अनेकांनी कौतुक केले. अयोध्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देशात पोलीस प्रशासनाच्या वतीने अलर्ट जाहीर करण्यात आला होता. अयोध्या निकालानंतर कोणत्याही प्रकारच्या कायदा व सुव्यवस्था बिघडू नये म्हणून पोलीस प्रशासनाने बंदोबस्त केलेला होता. याशिवाय सोशल मीडियावर कोणत्याही प्रकारचा धार्मिक तेढ निर्माण होऊ नये, अन्यथा कारवाई करण्यात येईल असा आदेश देखील काढला होता. पोलीस प्रशासनाने काढलेल्या या आदेशामुळे सोशल मीडिया युजर्स अलर्ट झाल्याचे पाहायला मिळाले. पोलिसांच्या या या आदेशाला नागरिकाकडुन सकारात्मक प्रतिसाद दिला असून सामाजिक सलोखा राखला.
रामजन्म भूमी आणि बाबरी मशिद वादावर मिळणारा निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला असेल, त्यामुळे सुप्रीम न्याय व्यवस्थेने दिलेला निर्णय मान्य करणे नागरिकांना बंधनकारक असतो, अन्यथा सोशल मीडियावर निकाल संदर्भात चांगल्या – वाईट प्रतिक्रिया देणे हा न्याय संस्थेचा अवमान ठरेल, म्हणून सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनाने दिला होता.