शेंगदाणेला 180 तर खोबऱ्याला प्रति किलो 280 रुपये भावाने केली विक्री
पुणे – संपूर्ण राज्य करोनाच्या सावटाखाली असताना जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने जीवणावश्यक वस्तूंच्या किमती ठरवून दिलेल्या असताना देखील काही दुकानदारांचा आठमुडेपणा यानिमित्ताने समोर आला आहे. याप्रकरणी बाणेर व खडकी बाजार येथील दुकानदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
पन्नाराम पुनाजी चौधरी (वय 43, रा. बालेवाडी) आणि गौरव राजेंद्र अगरवाल (वय 28, रा.नवा बाजार, खडकी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई चतुःशृगी आणि खडकी पोलिसांनी केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 31 मार्च रोजी बाणेर येथील दुकानदार पन्नाराम चौधरी हा शेंगदाणे 180 रुपये, तूरडाळ 160, मुगडाळ 155, चणाडाळ 140, खोबरे 280 आणि साबुदाणा 135 रुपये किलो याप्रमाणे किराणा मालाची विक्री करत असल्याचे दिसून आले. तसेच 1 एप्रिल रोजी खडकी बाजार येथे गौरव अगरवाल याचे किराणा भुसार मालाचे दुकान आहे. त्याने अव्वाच्या सव्वा दराने किराणा मालाची विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली आहे. तो शेंगदाणे 140, खोबरे 220 प्रति किलो अशा दराने विक्री करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
दोन्ही दुकानदारांवर जीवनावश्यक वस्तू कायदा 3व 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी संचारबंदीचा फायदा घेऊन जीवनावश्यक वस्तूंची चढ्या दराने विक्री करणाऱ्या दुकानदार, व्यापारी यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस प्रशासन यांच्याकडून सांगण्यात आले आहे.
ही कारवाई अंमली पदार्थ व खंडनी विरोधी पथक (पूर्व विभाग) पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक विजय टिकोळे, सहायक पोलिस निरीक्षक बापू रायकर, पोलीस कर्मचारी अविनाश शिंदे, दिलीप जोशी, प्रवीण शिर्के, मोहन साळवी, अर्जुन दिवेकर, सुशील काकडे, प्रफुल्ल साबळे यांनी केली.