पुणे,दि.15 – करोनाची साखळी तोडण्यासाठी पोलीस अहोरात्र काम करत आहेत. वेळप्रसंगी ते स्वत:चा जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांची मदतसुध्दा करत आहे. हे काम करत असताना ते खाकी वर्दीपलिकडे जावून माणूसकीही जपत आहेत. फक्त अन्न धान्याचे कीट व फुड पॅकेट वाटप करण्यापर्यंत त्यांनी कार्य मर्यादीत ठेवले नाही. तर काही अधिकाऱ्यांनी संकटात सापडलेल्यांना मोठा मानसिक आधारही दिला आहे. याचमुळे खाकी वर्दीतील काही अधिकारी सर्वसामान्यांना खाकी वर्दीतील फरिश्ते वाटत आहेत. अशाच एका अधिकाऱ्याने जात, धर्म, राजकारण आणी वदीपलिकडे जात केलेल्या कार्याला नागरिकांनी सॅल्युट केला आहे.
यासंदर्भात दैनिक प्रभातशी बोलताना अलीभाई म्हणाले, करोनाच्या पहिल्या लाटेत माझ्या 37 वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला. त्याची तब्बेत खराब झाल्यावर त्याला रुग्णालयात दाखल करण्यातआले होते. तो पॉझिटीव्ह निघाल्यावर आमच्या कुटूंबातील 14 जणांना क्वारंटाईन व्हावे लागले होते. यावेळी त्याच्यावरील उपचारासाठी दत्तवाडी पोलीस ठाण्यातील (तात्कालीन)वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी सर्वोपतरी प्रयत्न केले. त्यांनी वारंवार आमच्या कुटूंबाला फोनवरुन संपर्क साधत आमचे मनोबल वाढवले. मुलाच्या उपचारासंदर्भातली सातत्याने आढावा घेतला. मात्र पाच ते सहा दिवसांतच मुलाचा मृत्यू झाला. आम्ही क्वारंटाईन असल्याने काही करुन शकत नव्हतो. मात्र घेवारे साहेबांनी समाजातील ईतर व्यक्तींना बरोबर घेत आमच्या रितीरिवाजा प्रमाणे त्याच्यावर अत्यंसंस्कार केले. यानंतरही घेवारे साहेब सातत्याने आमच्या संपर्कात होते.
आम्हाला क्वारंटाईनचा कलावधी संपल्यावर कधी सोडण्यात येणार आहे, याची माहिती घेतली. यानंतर त्यांनी आम्ही घरी येण्याअगोदर आमचे घर सॅनिटाईज करुन घेतले होते. घरी आल्यावर आम्हाला कोणतीच अडचण येऊ नये म्हणून अंडी, दुध, ब्रेड अशी खाण्याची व्यवस्थाही करुन ठेवली होती. दरम्यान सध्याच्या दुसऱ्या लाटेत माझा दुसरा 45 वर्षीय मुलाचे करोनाने नुकतेच निधन झाले. हा माझ्यासाठी मोठा धक्का होता. माझे वय 68 वर्षाचे असल्याने सूना आणी नातवडांची सर्व जबाबदारी पडली माझ्यावर आहे. घेवारे साहेबांची सिंहगड पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. मात्र त्यांनी याची खबर मिळताच त्यांनी माझ्या घराकडे धाव घेतली. त्यांनी माझ्या घरच्यांना आत्मविश्वास दिला.
मनापासून सॅल्यूट –
“इंसान इंसानके काम आता है’ धर्म आणी राजकारण करोनासारख्या परिस्थितीत बाजूला रहाते. देवीदास घेवारे यांनी मला भावापेक्षाही जास्त प्रेम दिले आहे. मी त्यांना मनापासून सॅल्युट करतो. –अली भाई (दत्तवाडी)