पिंपरी – विधानसभा निवडणुकीच्यावेळी पिंपरीत झालेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या राजकीय भांडणातून दोन गटांनी परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र गुन्ह्यामध्ये चारच जणांची नावे असताना पोलिसांनी 14 जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले. याप्रकरणी सखोल चौकशीची मागणी करीत संबंधित पोलिसांची बदली करण्याची मागणी डब्बू आसवानी यांनी केली होती.
विशेष म्हणजे ज्या अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी करण्यात आली त्या सर्वांच्या बदल्या करण्यात आल्या. या बदल्या योगायोग होत्या की राजकीय वादातून झाल्या याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या दिवशी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. यामध्ये दोन्ही गटांकडून परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले. दोन्ही गटातील संबंधित आरोपींना पोलिसांनी अटक करून तुरूंगात पाठविले.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी या गुन्ह्यांचा तपास पिंपरी पोलिसांकडे न देता गुन्हे शाखेकडे दिला. पोलिसांनी या गुन्ह्याचे आरोपपत्र दाखल न्यायालयात दाखल केले. चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला असताना 14 जणांच्या विरोधात आरोपपत्र कसे, असा सवाल उपस्थित करीत आसवानी गटाकडून याबाबत उघड नाराजी व्यक्त करण्यात आली. पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांची तपासातील भूमिका संशयास्पद असून त्यांची बदली करण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली.
सध्या पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, उपायुक्त स्मिता पाटील, सहायक आयुक्त श्रीधर जाधव यांची बदली करण्यात आल्याने या बदल्या योगायोग म्हणाव्यात का राजकीय वादातून या बदल्या झाल्या आहेत, याबाबत पिंपरी परिसरात आता चर्चा रंगू लागल्या आहेत.
यापूर्वी देखील नगरसेवक अविनाश टेकवडे यांच्या खून प्रकरणात देखील पिंपरी पोलिसांवर पैसे घेऊन आरोपी गोवण्याचे गंभीर आरोप झाले होते. एका रात्रीत हा गुन्हा तपासाकरिता पुणे पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेकडे देण्यात आसवाणी गटाला यश आले होते. या प्रकरणात आरोपी बनविण्यात आलेले बाबू शेट्टी मात्र न्यायालयातून आरोपमुक्त झाले होते.