गृहमंत्र्यांकडून दोन पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन,पोलिस अधीक्षकांची बदली
मुंबई: अकोल्यातील बेपत्ता मुलीच्या तक्रारीची दखल न घेणाऱ्या आणि तपासात दिरंगाई करणाऱ्या दोन पोलिस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. त्याचबरोबर या पोलिस अधिकाऱ्यांकडून योग्यरितीने काम करून न घेणाऱ्या आणि तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिस अधीक्षकांचीही बदली करण्याचे आदेश त्यांनी दिले. याप्रकरणी किरण ठाकरे यांनी तक्रार दाखल केली होती.
अकोला पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी भानुप्रताप मडावी आणि श्रीमती कराळे यांनी या तक्रारीनंतर योग्यरितीने तपास केला नाही. तक्रारदारांना योग्य सहकार्य न केल्याबद्दल त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिल्याचे देशमुख यांनी सांगितले. तर अकोला जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक अमोघ गावकर यांनी तपासात दिरंगाई केल्याबद्दल त्यांची तडकाफडकी बदली करण्याचे आदेशही दिल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात कुठेही महिलांवर अत्याचार झाल्यास त्याबाबतची तक्रार किंवा गुन्हा दाखल करून न घेणाऱ्या पोलिसांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस खात्याला दिल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.