13 नक्षलवाद्यांचा चकमकीत मृत्यू
मुंबई – गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या चकमकीत 13 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला. पोलिसांच्या सी-60 कमांडोंशी त्यांची चकमक उडाली होती.
इटापल्लीमधील कोटमी जंगलात पहाटे साडेपाचच्या सुमारास ही चकमक उडाली. येथे एका बैठकीसाठी नक्षलवादी जमा झाले होते, अशी माहिती गडचिरोलीचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी दिली.
खबऱ्यांकडून मिळालेल्या विश्वासार्ह माहितीच्या आधारे सी-60 कमांडोंनी या भागात शोधमोहीम राबवली.
मात्र, नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांनी सुरू केलेल्या गोळीबाराला पोलिसांनी गोळीबारानेच उत्तर दिले. त्यात 13 नक्षलवाद्यांचा मृत्यू झाला, असे त्यांनी सांगितले.
ही चकमक साधारणत: तासभर सुरू होती.
त्यानंतर उरलेले नक्षलवादी घटनदाट जंगलात पळून गेले, असे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी सांगितले. या नक्षलवाद्यांचे मृतदेह घटनास्थळावरून उचलण्यात आले असून, त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. या भागात शोध मोहीम पुन्हा सुरू करण्यात आली आहे.