कुरवली – इंदापूर तालुक्यातील पश्चिम भागातील शाळा महाविद्यालयात वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या निर्भया पथकाकडून साध्या वेशात गस्त सुरु आहे. यामध्ये शाळा महाविद्यालयीन मुलीशी संवाद साधत रोडरोमिओगिरी करणाऱ्या टोळक्यांवर नजर ठेवली जात असल्याने विद्यार्थ्यांनी निर्भया पथकाचे आभार व्यक्त केले आहेत.
वालचंदनगर परिसरातील विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, फडतरे नॉलेज सिटी, वालचंद विद्यालय, भारत चिल्ड्रेन ऍकॅडमी व वर्धमान विद्यालयामध्ये शेकडो मुले-मुली शिक्षणासाठी येतात. शिक्षण घेणाऱ्या मुलींना निर्भय पथकाची साथ मिळाल्याने मुलींनी समाधान व्यक्त केले आहे.
महिलांना निर्भय बनविण्यासाठी महिलांवरील अत्याचार, लैगिंक छळ, छेडछाड, महिलांविषयक गुन्हे नियंत्रित करणे आणि गुन्हेगारांची मानसिकता बदलणे हे आजच्या घडीला पोलिसांसमोरील मोठं आव्हान आहे. महिला सुरक्षिततेसाठी निर्भया पथकाची ऑगस्ट 2016 रोजी स्थापना केली आहे. निर्भया पथकाच्या स्थापनेमुळे कोल्हापूर परिक्षेत्रात महिलांच्या छेडछाडीचे प्रमाण कमी होण्यास मदत झाली आहे.
कोल्हापूर परिक्षेत्रात कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा व पुणे या जिल्ह्यात निर्भया पथकाच्या माध्यमातून काम सुरु आहे. जिल्हा पातळीवर जिल्हा पोलीस अधीक्षक आणि शहरी भागामध्ये पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली या पथकाचे काम चालते. प्रत्येक जिल्ह्यात पथकांची स्थापना करण्यात आली आहे.
विभागीय पोलीस अधिकारी बारामती गणेश इंगळे यांचे बारामती विभाग करिता नियंत्रण आहे. वालचंदनगर निर्भया पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक बिराप्पा लातुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक सुनिता दळवी वालचंदनगर पोलीस स्टेशन या काम करीत आहेत.
त्यांच्या सोबत महिला पोलीस हवालदार माधुरी लडकत इंदापूर पोलीस स्टेशन व महिला पोलीस नाईक प्रिया पवार भिगवण पोलीस स्टेशन ह्या टीममध्ये काम करित आहेत.
…म्हणून निर्भया पथकाची स्थापना
महिलांची छेडछाड हा अत्याचारातील अगदी पहिला टप्पा आहे. फोन कॉल, मेसेज, ई-मेल, सोशल मीडियाचा वापर करुन किंवा प्रत्यक्षरित्या महिलेची छेड काढली जाते, अशा वेळी महिलांना विनाविलंब पोलिसांची मदत उपलब्ध करून देऊन तिच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे,
महिला/ शाळकरी मुलींच्या छेडछाडीकडे होणारे दुर्लक्ष व त्यातून अपराध्यांचे वाढणारे बळ यांवर प्रभावी नियंत्रण आणणे, पुरुषांना विशेषत: तरुणांना त्यांच्या गैरवर्तनाची समुपदेशनातून जाणीव करून देणे आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीने त्यांना सुधारण्याची संधी देण्याच्या संकल्पनेतून निर्भया पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे.