शरद पवार यांचा स्वतंत्र चौकशीचा पुनरूच्चार
जळगाव : एल्गार परिषदेचा तपासावरून महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याचे आता उघड होत आहेत. दरम्यान, या प्रकरणाचा तपास केंद्राकडे अर्थात एनआयएकडे सोपवण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिक्कामोर्तब केले. मात्र एल्गार आणि कोरेगाव-भीमा प्रकरणी एसआयटीमार्फत समांतर चौकशीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेस अजूनही आग्रही असल्याचे दिसत आहे. राज्य सरकारकडून समांतर चौकशी करण्यासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुखांनी संकेत दिल्यानंतर शरद पवारांनी देखील स्वतंत्र चौकशीचा पुनरुच्चार केला आहे.
भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद हे वेगवेगळे विषय आहेत. विद्रोही साहित्य लिहिणे, सरकारच्या विरोधात बोलणे हा देशद्रोह होऊ शकतो का? असा सवाल शरद पवार यांनी उपस्थित केला. एनआयएकडून तपास करणे हा केंद्राचा अधिकार आहे, मात्र राज्याला देखील अधिकार आहेत. राज्य सरकारला विश्वासात घ्यायला पाहिजे. कोरेगाव-भीमा प्रकरण घडलं त्यावेळी फडणीस सरकार होतं. त्यामुळे या घटनेत काहीतरी लपवण्यासारखं असेल म्हणूनच केंद्राने हा तपास एनआयएकडे दिला आहे, असा आरोप शरद पवारांनी केला.
एल्गार परिषद प्रकरणाचा तपास केंद्राकडे सोपवण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी होकार दिल्याने महाविकास आघाडीत ठिणगी पडल्याचं बोललं जात आहे. अशातच आज शरद पवारांनी स्वतंत्र चौकशीची मागणी लावून धरल्यानं हे प्रकरण कोणत्या वळणावर जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.