उपमुख्यमंत्री अजित पवार : जनतेने खरेदीसाठी गर्दी न करण्याचे आवाहन
राज्य, जिल्हाबंदी, संचारबंदीची कठोर अंमलबजावणी
पुणे – करोनाच्या संसर्ग प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी आणि संचारबंदीसारख्या निर्णयांची अंमलबजावणी राज्यात कठोरपणे करण्यात येईल, त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
भाजीपाला, फळे, दूध, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत ठेवण्यात येणार असल्याने नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये. करोनाच्या धोक्यापासून दूर राहण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकांची स्वत:ची असून त्याप्रमाणे त्यांनी वर्तन ठेवावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
राज्यात संचारबंदी लागू असतानाही काही नागरिकांकडून बाजारात खरेदीसाठी गर्दी केली जात आहे. नागरिक अकारण गाड्या घेऊन रस्त्यावर उतरत आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका वाढत आहे. राज्य सरकारचा आरोग्य विभाग, पोलीस विभाग, महापालिका, नगरपालिकांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे, प्रशासनातील अधिकारी-कर्मचारी जे सर्वजण जीव धोक्यात घालून आपले कर्तव्य पार पाडत आहेत. राज्याच्या प्रत्येक घरातला माणूस या संसर्गापासून मुक्त राहावा यासाठी ते धोका पत्करत असताना, जनतेनेही संयम पाळून सरकारच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
स्वत:ला आणि कुटुंबाला वाचवण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकाची आहे. गांभीर्य ओळखून सर्वांनी घरी बसावे आणि सहकार्य करावे. सुदैवाने, राज्यातला या रोगाचा प्रसार अद्याप मर्यादित आहे. काही बाधित व्यक्ती या रोगातून मुक्तही झाल्या आहेत. ही चांगली लक्षणे असल्याचे सांगून, या लढाईत राज्यातील प्रत्येकाने घरी बसून योगदान द्यावे, असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
उपमुख्यमंत्री यांच्या आवाहनातील मुद्दे
– राज्य प्रवेशबंदी, जिल्हा प्रवेशबंदी, संचारबंदीची कठोर अंमलबजावणी
– पोलिसांना अंमलबजावणीसाठी संपूर्ण स्वातंत्र्य
– नागरिकांनी घरीच थांबून सहकार्य करावे.खरेदीसाठी बाजारात गर्दी करू नये.
– भाजीपाला, फळे, अन्नधान्य जीवनावश्यक पुरवठा सुरळीत ठेवणार.
– जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवणे ही सरकारची जबाबदारी.
– कृषी उत्पन्न बाजार समितीतील आवक सुरळीत ठेवणार
– भाजीपाला, फळ उत्पादक शेतकऱ्यांचा माल बाजारात येणार, त्यांचे नुकसान होणार नाही.
– राज्यातील आरोग्य अधिकारी, कर्मचारी, पोलीस चांगले काम करत आहेत.
– आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी उपाययोजना सुरू, व्हेंटिलेटर्सची संख्या वाढवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू.
– मास्क, सॅनिटायझर, औषधांचे, जीवनावश्यक वस्तूंचा अवैध साठा, काळाबाजार करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकणार