लोणी काळभोर – उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या हद्दीत १५ महिन्यांपूर्वी झालेल्या एका खुनातील मुख्य साक्षीदारांनी विरोधात साक्ष दिल्यास शिक्षा होऊ शकते म्हणून साक्षीदारांना जीवे मारण्याचा रचलेला कट लोणी काळभोर पोलिसांनी उधळून लावला असून याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने चौघांना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले असून या प्रकरणी अजून काही जणांना अटक होण्याची शक्यता आहे.
लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले या प्रकरणी आशिष अनिल वरगडे ( वय. २२, रा. आश्रमरोड, उरुळीकांचन, ता. हवेली ), उध्दव राजाराम मिसाळ ( वय. ४५ रा. दत्तवाडी, उरुळीकांचन ), सुरज सतीश जगताप ( वय. २४, रा. गणेशवाडी, वरवंड, ता. दौंड ) व किशोर ऊर्फ शिवा छबु साळुंके ( वय. २८, रा. बोरीपार्थी, केडगाव, ता. दौंड ) अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत हॉटेल सोनाईच्या समोर ऑक्टोंबर २०२१ मध्ये संतोष जगताप व त्याचा अंगरक्षक यांचा भर रस्त्यामध्ये गोळीबार करुन खून करण्यात आला होता. सदर घटनेमध्ये समोरा समोरील गोळीबारामध्ये तिघेजण मरण पावले होते. त्यानुसार आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयातील अनेक साक्षीदारांपैकी महत्वाचे साक्षीदारांना संपविण्याचा कट संतोष जगताप खून खटल्यातील मुख्य आरोपींनी पुण्यातील शिवाजीनगर न्यायालयात हजर केल्या दरम्यान पोलीस अभिलेखावर गुन्हेगार असलेल्या त्यांच्या जवळच्या मित्रांना काही लाख रुपयांची सुपारी देऊन रचला होता अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या अनुषंगाने लोणी काळभोर पोलीस शनिवारी गस्त घालीत असताना पोलीस कर्मचारी निखील पवार यांना एका खबऱ्याकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार उरुळी कांचन येथे सापळा रचुन गावठी कट्टा व तिक्ष्ण हत्यारासह दोघांना शिताफीने ताब्यात घेतले.
अंगझडतीमध्ये त्यांच्याकडुन एक गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुसे, एक धारदार चाकू अशी घातक हत्यारे जप्त करण्यात आली. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी आणखी दोन साथीदारांची नावे सांगितली. त्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. सध्या संतोष जगताप खून खटल्याची सुनावणी सुरु आहे. अशावेळी सदर गुन्ह्यामधील मुख्य साक्षीदारांच्या साक्षीवर यातील सर्व आरोपींना शिक्षा होण्याची दाट शक्यता आहे.
ही गोष्ट आरोपींना माहित असल्याने त्यांनी मुख्य साक्षीदारांना संपवुन टाकण्याचा कट रचला होता. त्यांनी कोर्टात हजर केलेवेळी मोठी रक्कम देण्याचे आश्वासन देऊन अटक आरोपींना त्यांचे बाहेर असलेल्या हस्तकांमार्फत हत्यारे पुरवले असल्याची बातमी लोणीकाळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण व त्यांच्या पथकाला मिळाली होती.
२०१५ मध्ये कुविख्यात गुंड व वाळुमाफिया आप्पा लोंढे याचा संतोष भिमराव शिंदे (रा. शिंदवणे ता. हवेली), निलेश खंडु सोलनकर रा. डाळींब, दत्तवाडी, ता. हवेली), राजेंद्र विजय गायकवाड ( रा. शिंदवणे, ता. हवेली ), आकाश सुनिल महाडीक ( रा. उरुळी कांचन), विष्णु यशवंत जाधव ( रा. माळवाडी ), नागेश लक्ष्मण झाडकर ( रा. उरुळी कांचन ) यांनी खून केला होता. त्यांना मोक्का गुन्ह्यात शिक्षा लागल्याने ते अद्याप तुरुंगात आहेत.
सदर केस मध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगार व वाळुतस्कर याने आरोपींना शिक्षा होऊ नये म्हणुन प्रयत्न केला या संशयावरुन २२ ऑक्टोंबर २०२१ रोजी संतोष जगताप याचे मर्डर केस मधील आरोपी नामे विष्णु यशवंत जाधव याने कट रचुन संतोष जगताप याचा खुन केला होता. सदर घटनेमध्ये समोरासमोर झालेल्या गोळीबारामध्ये संतोष जगताप व इतर दोघांचा खून झाला होता. सदर घटनेमुळे त्यावेळी संपुर्ण पुणे शहर हादरले होते.
सदराची कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे, हवालदार नितीन गायकवाड, सुदर्शन बोरावके, अमित साळुंके, संभाजी देवीकर, सुनिल नागलोत, श्रीनाथ जाधव, गणेश भापकर, बाजीराव वीर, चक्रधर शिरगीरे, शैलेश कुदळे, महिला पोलीस विश्रांती फणसे यांनी केली आहे.