सुरेश डुबल
व्यायाम व आहाराकडे लक्ष आवश्यक
पोलीस दलात काम करताना दिवसभराचे नियोजन बिघडत असते. वेळेवर झोप मिळत नाही तसेच आहारही वेळेत घेता येत नाही. मात्र पोलिसांनी आपल्या दिवसभराचे नियोजन ठरवणे गरजेचे आहे. तसेच व्यायाम व आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. यासह वर्षातून दोन ते तीनवेळा शारीरिक तपासणी केली पाहिजे, जेणेकरून लहान मोठे आजारावर उपचार घेता येतील.
कराड – घरदार सोडून सर्वसामान्यांच्या रक्षणासाठी रस्त्यावर उभे असणाऱ्या पोलिसांचे दिवसेंदिवस स्वास्थ्य बिघडू लागले आहे. निवडणुका आल्या, आहेत पोलीस. दिवाळी असो की ईद पोलीस आहेतचं. मात्र तेही माणूसच आहेत, त्यांनाही भावना आहेत, त्यांचंही घरदार आहे. हे सर्व सोडून आपले कर्तव्य बजावण्यात पोलीस मशगुल झाले आहेत की त्यांच्याकडे स्वतः आवश्यक वेळच मिळत नाही. त्यामुळे अपुरी झोप व अवेळीचा आहार यासह असंख्य गोष्टी या ताण-तणावाला कारणीभूत ठरत आहेत. परिणामी चार दिवसाच्या अंतरात जिल्ह्यातील दोन पोलिसांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याने पोलीस दलातील ताण-तणावाची भयावह स्थिती अधोरेखित झाली आहे.
पोलीस दलात गेल्या तीस वर्षापासून कार्यरत असणारे कराड उपविभागीय कार्यालयातील सहाय्यक फौजदार राजेंद्र राऊत यांचे वयाच्या छप्पन्नाव्या वर्षी कर्तव्य बजावताना हृदयविकाराने मृत्यू झाला. ते चालक म्हणून कार्यरत होते. पुण्याहून कराडकर येताना खेड शिवापूर येथे गाडीमध्ये त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला. त्यांनी आपली गाडी बाजूला घेऊन शेवटच्या क्षणापर्यंत आपले कर्तव्य पार पाडले. तर अवघ्या चारच दिवसात बुधवारी सिद्धनाथ यात्रेनिमित्त म्हसवड येथे वाहतूक शाखेच्या क्रेनवर कर्तव्य बजावताना पन्नस वर्षीय हवालदार विकास पवार यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले.
सद्रक्षणाय खलनिग्रहणायफ हे ब्रीदवाक्य घेऊन सर्वसामान्य जनतेसाठी नेहमी तत्पर असणारे हे पोलीस. जुन्या काळात ज्या पद्धतीने पोलिसिंग चालत होते त्यात काळानुरूप हळूहळू बदल होतोयं. मात्र मानसिक ताण हा काही कमी होत नाही. गुन्हेगारांची पाळेमुळे खोदून, गुन्हेगारी मोडीत काढण्याचे खरे काम पोलिसांचे आहे. सध्या हायटेक चोरांचा बंदोबस्त करण्यासाठी हायटेक पोलिसिंग राबवले जाते. मात्र सण-उत्सव असो की निवडणूक यात खरा पोलीस गुंतलाय. जिल्ह्यात क्राईमरेट वाढत आहे, अशी बोंब स्वयंघोषित समाजसेवक अधूनमधून ठोकत असतात.
मात्र या पोलिसांचे मुख्य काम काय? हे त्या समाजसेवकांना न कळावे हे एक कोडंच आहे. कारण जिल्ह्यात लोकसंख्येचा विचार करता, जेवढे पोलीस आवश्यक आहेत तेवढे सद्यस्थितीला उपलब्ध नाहीत. बारा-बारा तास बिन अन्नपाण्याचे, निवडणुका असो की सणउत्सवात कर्तव्य बजावताना जिवाची काय अवस्था होते हे फक्त पोलिसच सांगू शकतो. मात्र या सर्व बाबींचा विचार कोण करतो. कुठं कायदा सुव्यवस्थेचा किरकोळ प्रश्न जरी निर्माण झाला, किंवा एखाद्या ठिकाणी पोलीस काही मिनिटं जरी वेळाने आला तरी त्यांच्या नावाने बोटे मोडताना सद्यस्थितीचा विचार स्वयंघोषित समाजसेवकांकडून होत नाही. हेही पोलिसांच्या तणावाचे मोठे कारण असू शकते. यासाठी पोलिसांकडे माणूस म्हणून बघितल्यास बऱ्याच सकारात्मक गोष्टी त्यांच्याकडून घडून येतील.
पोलीस दलात काम करताना दिवसभराचे नियोजन बिघडत असते. वेळेवर झोप मिळत नाही तसेच आहारही वेळेत घेता येत नाही. मात्र पोलिसांनी आपल्या दिवसभराचे नियोजन ठरवणे गरजेचे आहे. तसेच व्यायाम व आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. यासह वर्षातून दोन ते तीनवेळा शारीरिक तपासणी केली पाहिजे, जेणेकरून लहान मोठे आजारावर उपचार घेता येतील.
सूरज गुरव, पोलीस उपअधीक्षक