आत्महत्या, नैसर्गिक मृत्यू असला तरी पोलिसांच्या कार्यपद्धतीविरुद्ध टीकेची झोड
पोलीस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी “सीआयडी’ची मार्गदर्शक सूचना
पुणे – पोलीस कोठडीतील मृत्यू रोखण्यासाठी राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीआयडी) मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. पोलिसांच्या ताब्यातील आरोपीचा मृत्यू हा आत्महत्या किंवा त्याचा नैसर्गिक मृत्यू असला तरी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर व पोलिसांच्या कार्यपद्धतीविरुद्ध टीकेची झोड उठविली जाते. आरोपी पोलीस कोठडीत असताना आजारपणामुळे सर्वाधिक मृत्यू झाले असून हे मृत्यू टाळण्यासाठी सीआयडीने राज्यभरातील सर्व पोलीस प्रमुखांना मार्गदर्शक सूचना केल्या.
अटक करताना पंचनाम्यात आरोपीच्या बाह्यअंग व शरीरावरील जखमांचा तपशील नमूद करावा. वैद्यकीयदृष्ट्या फीट असेल तरच पोलीस कोठडी घ्यावी. कोठडीत ठेवण्यापूर्वी आरोपीच्या अंगझडतीत त्याच्याकडे हत्यार, विषारी पदार्थ, दोरी, ब्लेड, काडीपेटी, चाकू यासारख्या वस्तू बारकाईने शोधाव्यात. तपास पूर्ण झाला असल्यास पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्यास अटक आरोपीचे रिमांड घेणे टाळावे. जामीनपात्र गुन्ह्यात आरोपीस अटक केल्यानंतर विनाकारण कोठडीत न ठेवता जामिनावर मुक्त करावे.
नागरिकांनी आरोपीला मारहाण केल्यानंतर लोक आरोपीला पोलीस ठाण्यात हजर करतात, अशाप्रसंगी आरोपीला तत्काळ रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करावे. आरोपी पूर्ण बरा होईपर्यंत वैद्यकीय कोठडी घ्यावी. पोलीस कोठडीतील मृत्यू या विषयाबाबत पोलिसांची संवेदनक्षमता विकसित करण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण देण्यात यावे. आरोपीचा संशयास्पद मृत्यू झाल्यास मारहाणीचा आरोप होतात.
मृत्यू झालेल्या आरोपीच्या अंगावरील जखमांच्या खुणा जरी अटक करण्यापूर्वीच्या असल्या तरी त्याला पोलिसांनी मारहाण केल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप होतो. पोलीस कोठडीतील आरोपीस मारहाण करू नये, याबाबत अनेक परिपत्रकांद्वारे सूचित केले असले तरी त्यांची अंमलबजावणी होताना दिसून येत नाही. अटक करताना त्याच्या अंगावर प्राणघातक जखमा आहेत याची तपासणी करावी, अशा अनेक सूचना सीआयडीने दिल्या आहेत. गुन्ह्याचा तपास करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आरोपीकडे माहिती जमा करता येऊ शकते, असेदेखील नमूद केले आहे.
153 जणांचे कोठडीत मृत्यू
नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या नोंदीनुसार 2018 मध्ये महाराष्ट्रात पोलीस कोठडीतील एकूण मृत्यूपैकी पाच आजारपणामुळे झाले होते. आत्महत्येमुळे एकाचा, तर मारहाणीमुळे एकाचा मृत्यू झाला होता. पोलीस कोठडी घेतलेली नसतानाही पोलिसांच्या लॉकअपमध्ये 5 जणांचा मृत्यू झाला होता. तर, गेल्या दशकात राज्यात 153 जणांचे मृत्यू पोलीस कोठडीत झाले असून ठाणे व नागपूर येथे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत.