– शरद पवारांनी केली पोलिसांच्या चौकशीची मागणी
मुंबई : भीमा-कोरेगाव किंवा एल्गार परिषद प्रकरणाची चौकशी व्हावी ही आमची मागणी नाही. मात्र, या दोन्ही प्रकरणात पोलिस दलाचा गैरवापर झाला आहे ही चिंताजनक बाब आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज केला. सत्तेचा गैरवापर केला हे स्पष्ट होत असून हे प्रकरण लोकांच्या समोर आणायचे आहे. त्यामुळे ज्यापद्धतीने पोलिस दलाचा गैरवापर झाला आहे त्याची चौकशी व्हायला हवी अशी मागणीही पवारांनी यावेळी केली.
नरिमन पॉंईट येथे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पत्रकार परिषदेत शरद पवार बोलत होते. भीमा-कोरेगाव आणि एल्गार परिषदेचा तपास एनआयएकडे दिला तो केंद्राचा अधिकार आहे. परंतु भीमा कोरेगाव किंवा एल्गार याची चौकशी व्हावी ही आमची मागणी नाही. तर पोलिस दलाचा ज्यापद्धतीने गैरवापर झाला आहे त्याची चौकशी व्हायला हवी. या प्रकरणाचा चौकशी करण्याचा अधिकार राज्य सरकारलाही आहे. यामध्ये पुणे पोलिसांनी जो तपास केला त्यामुळे महाराष्ट्र पोलिस दलाच्या लौकिकाला धक्का बसला आहे.
त्यामुळे या प्रकरणात सहभागी असलेल्या महाराष्ट्र पोलिस आणि पुणे पोलिसांची चौकशी करण्यात यावी अशी मागणीही शरद पवार यांनी केली आहे. भीमा-कोरेगाव येथे अनेक वर्षे एका ठिकाणी लोकं स्तंभाला अभिवादन करण्यासाठी जमतात. येथील स्थानिक ग्रामस्थ इथे येणाछया लोकांना पाण्याची व्यवस्था करत होते. त्यावेळी कोणतीही कटुता नव्हती. मात्र आजुबाजूच्या खेड्यात संभाजी भिडे, एकबोटे यांनी फिरुन वेगळं वातावरण निर्माण केले.
भीमा कोरेगाव प्रकरणाची आयोगामार्पैत चौकशी सुरु आहे. त्यामुळे वस्तुस्थिती समोर येईलच, असेही पवार म्हणाले. कोरेगाव आणि एल्गारचा संबंध नव्हता. पुरोगामी विचाराच्या लोकांनी सहभागी होत ही एल्गार परिषद घेतली होती. त्या परिषदेत भाषणे झाली. पोलिस रिपोर्ट सादर केला गेला. पण त्याच्याशी संबंध नसलेल्या, तिथे हजर नसलेल्या लोकांवरही खटले भरण्यात आले आहेत.
सुधीर ढवळे यांनी नामदेव ढसाळ यांच्या कवितेचे वाचन केले म्हणून त्यांना अटक करण्यात आली. कवितेचा आधार घेऊन दोन – दोन वर्ष तुरुंगात टाकायचे ही गोष्ट योग्य नाही. पुरावे असे तयार केले की जामीन त्यांना मिळाला नाही. सर्वोच्च न्यायालयानेही या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. आमचीही तीच मागणी आहे. यामागे कोण आहे त्याची चौकशी व्हावी. त्यासाठी एसआयटी नेमा. चांगले अधिकारी घ्यावेत. जे काही पुरावे देण्यात आले त्यातील सत्य बाहेर येईल असेही शरद पवार म्हणाले.