जयपूर – भारताने ज्या वाळवंटी प्रदेशात आपल्या आजवरच्या सर्व अणुचाचण्या घेतल्या ते पोखरणचे क्षेत्र संरक्षन दलांच्या ताब्यात आहे. या पोखरण फायरिंग रेंजमध्ये रविवारी दुर्घटना घडली. येथील भादरिया गावातील दोन मुले सकाळी पोखरणमध्ये फिरायला आले होते. येथे त्यांना एक बॉम्ब सापडला. मुले तो बॉम्ब खराब असल्याचे समजून घरी घेऊन आले आणि त्याला उघडण्याचा प्रयत्न करत असतानाच त्याचा स्फोट झाला. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
स्फोटाचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जखमी मुलाला पोखरण येथे नेले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याला पुढील उपचारासाठी जोधपुरला हलवण्यात आले. मात्र, एकाचा जागीच मृत्यु झाला. बॉम्ब शक्तीशाली होता आणि त्याची पिन (सुरक्षा उपकरण) काढण्यात आलेली नव्हती. बहुधा ती पिन काढण्याच्या प्रयत्नातच हा स्फोट झाला असावा.
पोखरण देशातील सर्वात मोठी फायरिंग रेंज आहे. येथे सैन्य 12 महिन्या सैन्याचा युद्ध सराव सुरू असतो. सराव दरम्यान मोठ्या प्रमाणात दारुगोळा वापरला जातो. आजूबाजूच्या गावातील लोक तारबंदी नसल्यामुळे या क्षेत्रात प्रवेश करतात आणि बॉम्बचे भंगार काढून घेतात. माहितीच्या अभावामुळे अनेकवेळा जिवंत बॉम्ब देखील नेले जातात. यातील भंगार काढताना अपघात होतो. यापूर्वीही असे अनेक अपघात झाले आहेत.