गुवाहाटी – आसामच्या कारबी आँगलॉंग जिल्ह्यात सरकारी कार्यक्रमात विषबाधा झाल्याने एका तरूणाला प्राण गमवावे लागले. दीफू वैद्यकीय महाविद्यालयातील कार्यक्रमानंतर केलेल्या भोजनानंतर अनेकांना अस्वस्थ वाटू लागले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि आरोग्य मंत्री हिमंता विश्व सर्मा उपस्थित होते.
या कार्यक्रमात वाटलेले खाद्यापदार्थांच्या पाकिटातील खाद्य खाल्ल्यानंतर अनेकांना अस्वस्थ वाटू लागले. अनेक जणांना पोटदुखी आणि उलट्यांचा त्रास होऊ लागल्यानंतर किमान 145 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात कांगबुरा डे हा युवक मरण पावला.
आरोग्यमंत्री हिमंताविश्व बिस्वा म्हणाले की, 145 जणांना त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील 27 जणांना घरी सोडण्यात आले. तर 117 जणांवर अद्याप उपचार सुरू आहेत. कोरबी जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाच्या न्यायलयीन चौकशीचे आदेश दिले आहेत.