नगर – नगर तालुक्यातील देहरे येथील एका कुटुंबातील बारा जणांना अन्नातून विषबाधा झाली. जुनी बाजरी व पावसामुळे उबललेली बाजरी एकत्रित दळून आणूण त्याच्या भाकरी खाल्ल्याने विषबाधा झाली असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यातील एकाची प्रकृती नाजूक आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली. या सर्वांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ललिता अतुल वाघ (वय-25), राहुल रमेश माळी (वय-25), सुनीता राहुल माळी (वय-22), सुनिता रमेश माळी, जनाबाई शंकर माळी (वय -70), सुरज रोहिदास पवार (वय-20), पूजा भास्कर वाघ (वय-14), उषा भास्कर वाघ (वय-15), कार्तिक सुरज पवार (वय-2), सुदर्शन अरुण वाघ (वय-2), धीरज रमेश माळी (वय-20), या बारा जणांना विषबाधा झाली आहे. त्यातील धीरज माळी याची प्रकृती नाजूक असल्याचे समजते.
देहरे येथीळ रमेश माळी यांच्या घरी दोन दिवसांपूर्वी लग्न सोहळा होता. त्यामुळे काही नातेवाइक त्यांच्या घरी आले होते. शुक्रवारी सकाळी जनाबाई शंकर माळी यांनी जुने बाजरी व पावसाने ओली झालेली बाजरी एकत्रित करून दळून आणली होती. सोमवारी अकरा वाजण्याच्या सुमारास सर्वांनी बाजरीच्या भाकरी व भाजी खाल्ली.परंतु त्यांना अस्वस्थ वाटू लागले, तर काहींना उलट्या झाल्या. त्यामुळे हे सर्वजण दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास देहऱ्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी गेले. वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा काटे व कर्मचाऱ्यांनी या सर्वांवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.