महामार्गाचे काम सुरू : दुर्घटना टाळण्यासाठी विचार
पुणे – चांदणी चौक ते ताम्हिणी यादरम्यानचे रस्त्याचे काम रखडल्याने अनेक ठिकाणी वाहतुकीसाठी एकच लेन उपलब्ध असून, त्यातही पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल होऊन, तो वाहतुकीसाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे पौड ते ताम्हिणी हा रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा विचार प्रशासनाकडून सुरू आहे.
जळगाव ते दिघी पोर्ट या नव्याने होणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. या प्रकल्पात चांदणी चौक ते ताम्हिणी घाट या रस्त्याचाही समावेश आहे. पुण्यात चांदणी चौक ते पौड हा 17 किलोमीटर रस्ता चौपदरी असणार असून, पौडपासून दिघी पोर्टपर्यंत तीनपदरी रस्ता होणार आहे. त्यामुळे मुळशीत रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, त्यास स्थानिक लोक आणि हॉटेल चालकांकडून विरोध होत आहे. तसेच, वन विभागाकडूनही सहकार्य मिळत नसल्याने या रस्त्याचे काम रखडले आहे. यामध्ये 9 किलोमीटरचा रस्ता हा सिमेंट कॉंक्रिटचा तयार करण्यात आला आहे. त्यात काही ठिकाणी एकाच बाजूची लेन सिमेंटची केली आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीसाठी सिंगल लेन रस्ता आहे.
या रस्त्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपविले आहे. पाऊस सुरू होईपर्यंत हे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर हे काम थांबविण्यात येईल. पावसाळा संपल्यानंतरच उर्वरित कामाला सुरुवात केली जाणार असल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. रुंदीकरणासाठी या रस्त्याला समांतर खोदाई करण्यात आली आहे. त्यामुळे मातीचे प्रमाण प्रचंड आहे. एरवी पावसाळ्यास डांबरी रस्त्याची देखील मोठ्या प्रमाणावर दुर्दशा होत असते. आता मातीमुळे रस्त्यावर चिखल होऊन रस्ता वाहतुकीयोग्य राहणार नसल्याचे मत व्यक्त केले जात आहे.