पिंपरी, (प्रतिनिधी) – तीन वेळा सोडत प्रक्रिया राबवूनही नागरिकांचा प्रतिसाद न मिळाल्यामुळे रखडलेल्या पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) वाल्हेकरवाडी गृहयोजना आणि पेठ क्रमांक १२ येथील गृहप्रकल्पातील शिल्लक सदनिकांची सोडत काढण्यास अखेर मुहूर्त मिळाला आहे. महिना अखेरपर्यंत सोडत काढण्याची कार्यवाही पीएमआरडीएकडून राबविली जाणार आहे.
वाल्हेकरवाडी येथील पेठ क्रमांक ३० व ३२ येथे पीएमआरडीएच्या वतीने ७९८ घरांचा प्रकल्प साकारला आहे. या गृहप्रकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईडब्ल्यूएस) नागरिकांसाठी ३७८ वन रुम किचन सदनिका बांधून तयार आहेत. तर, अल्प उत्पन्न गटातील (एलआयजी) नागरिकांसाठी ४१४ वन बीएचके सदनिका आहेत.
घरांसाठी यापूर्वी एकदा सोडत काढण्यात आली होती. त्यावेळी ११५ जणांनी पूर्ण पैसे भरले होते. त्यापैकी ३६ कुटुंबाना निवडणूक आचारसंहितेपूर्वी ताबे देण्यात आले. दरम्यान, या गृहप्रकल्पातील बहुतांश घरे शिल्लक आहेत. त्यासाठी आता पुन्हा एकदा सोडत प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेमधील पेठ क्रमांक १२ येथील गृहप्रकल्पामध्ये पहिल्या टप्प्यात ४ हजार ८८३ घरे बांधण्यात आली. या गृहप्रकल्पात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील नागरिकांसाठी ३ हजार ३१७ तर, अल्प उत्पन्न गटासाठी १ हजार ५६६ सदनिका आहेत. या गृहप्रकल्पांमध्ये ईडब्ल्यूएसमध्ये असणाऱ्या सर्व वन बीएचके सदनिका वितरित झालेल्या आहेत.
परंतु, अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी उभारलेल्या २ बीएचके घरांपैकी अनेक घरांचे वितरण प्रलंबीत आहे. त्यासाठी देखील नव्याने सोडत काढली जाणार आहे. महिना अखेरपर्यंत नव्याने सोडत प्रक्रिया राबवून सदनिकांचे हस्तांतरण करण्यात येणार आहे.
चारवेळा मुदतवाढ तरीही रखडला होता प्रकल्प
सन २०१६ मध्ये निविदा प्रक्रिया राबवून एका खासगी कंपनीला हा गृहप्रकल्प विकसित करण्यासाठी ४२ महिन्यांच्या मुदतीवर काम देण्यात आले. त्याची मुदत सन २०१९ पर्यंत असताना दरम्यान करोनामुळे हा प्रकल्प रखडला. पीएमआरडीएचे अधिकारी अथवा ठेकेदार संस्थेचे प्रतिनिधी प्रकल्पाकडे फिरकले नसल्याने या जागेवर अतिक्रमण झाले.
हा प्रकल्प मार्गी लावण्यात अडचणी निर्माण झाल्या. मुदतीत प्रकल्प पूर्ण करण्यात ठेकेदाराला अपयश आल्यानंतर ठेकेदाराला तब्बल चारवेळा मुदतवाढ देण्यात आली.
तरीही, काम पूर्ण न झाल्याने ठेकेदाराला एक कोटी ६१ लाख रुपयांचा दंड लावण्यात आला. कोरोनानंतर बांधकाम साहित्य आणि कच्च्या मालात झालेली भाववाढ, वाढती महागाई यामुळे भाववाढ मिळण्याबाबत कंत्राटदाराने पीएमआरडीएकडे विनंती केली होती.
करोना प्रादुर्भाव आणि कामाची गती लक्षात घेऊन ५८.७० लाख रुपये दंडाची रक्कम कंत्राटदाराला परत केली गेली. तरी, त्याने प्रकल्प पूर्ण करण्यास विलंब लावल्याने आमदार अश्विनी जगताप यांनी डिसेंबर २०२३ मध्ये हिवाळी अधिवेशनात तारांकीत प्रश्न मांडला होता. उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हा प्रकल्प पूर्ण करुन घेण्याचे आदेश पीएमआरडीएला दिले होते.
पेठ क्रमांक १२ आणि वाल्हेकरवाडी याठिकाणी बांधण्यात आलेल्या दोन गृहप्रकल्पांमधील शिल्लक सदनिकांचे हस्तांतरण करण्यासाठी नव्याने सोडत काढण्यात येणार आहे. चालू महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोडत काढण्याचे नियोजन आहे.- अभिजीत जगताप, तहसीलदार, पीएमआरडीए