जयदीप सूर्यवंशी Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड शहरासह उपनगरांमध्ये पीएमपीएमएल बससेवेचा वापर करणाऱ्या हजारो प्रवाशांना दररोज अस्वच्छता, अपुरी सुरक्षा आणि मूलभूत सुविधांच्या अभावाचा सामना करावा लागत आहे. बससेवा वाढवण्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक बसस्टॉपवर घाण, अंधार आणि असामाजिक घटकांचा वाढता वावर यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. शहरातील अनेक बसस्टॉपवर कचऱ्याचे ढीग, थुंकीचे डाग, दुर्गंधी आणि तुटलेली संरचना दिसून येते. काही ठिकाणी बसण्यासाठी असलेली बाके खराब अवस्थेत असून नागरिकांना उभे राहून बसची वाट पाहावी लागते. नियमित स्वच्छता होत नसल्याने बसस्टॉपची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असल्याची तक्रार प्रवाशांकडून केली जात आहे. रात्री मद्यप्रेमींचा वावर विशेष म्हणजे रात्रीच्या वेळी अनेक बसस्टॉपवर मद्यप्रेमी झोपलेले किंवा बसलेले दिसतात. काही ठिकाणी मद्यपान करून गोंधळ घालण्याचे प्रकारही होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. त्यामुळे महिला, विद्यार्थिनी, ज्येष्ठ नागरिक आणि रात्री प्रवास करणाऱ्या प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रकाश व्यवस्था आणि सुरक्षेचा अभाव अनेक बसस्टॉपवर पुरेशी प्रकाश व्यवस्था नसल्याने रात्रीच्या वेळी परिसर अंधारात बुडालेला असतो. काही ठिकाणी स्ट्रीट लाईट बंद अवस्थेत असून त्यामुळे असामाजिक घटकांना मोकळे रान मिळत असल्याचे चित्र आहे. सुरक्षा रक्षक किंवा सीसीटीव्ही यंत्रणांचा अभावही मोठी समस्या ठरत आहे. आयटीनगरीत बसस्टॉपचाच अभाव देशातील प्रमुख आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी परिसरातच सार्वजनिक वाहतुकीच्या मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येत आहे. हिंजवडी फेज २ परिसरात अनेक ठिकाणी अधिकृत बसस्टॉप नसल्यामुळे प्रवाशांना रस्त्याच्या कडेला उभे राहून बसची वाट पाहावी लागत आहे. दररोज हजारो आयटी कर्मचारी, विद्यार्थी आणि कामगार या मार्गावरून प्रवास करतात. मात्र बसस्टॉप नसल्यामुळे उन्हाळ्यात उन्हाचा तडाखा, पावसाळ्यात पावसाचा मार आणि रात्री अंधारात उभे राहण्याची वेळ प्रवाशांवर येत आहे. महिलांना आणि रात्री उशिरा शिफ्ट संपवून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले जात आहे. हिंजवडी गावठाण परिसरातही अनेक प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे वाहतुकीचा धोका वाढत असून प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महिलांसाठी स्वतंत्र बसची मागणी पिंपरी चिंचवड येथून पुणे शहरात नोकरी आणि शिक्षणासाठी जाणाऱ्या महिला आणि विद्यार्थिनींची संख्या मोठी आहे. मात्र बसमधील गर्दी आणि सुरक्षेच्या प्रश्नांमुळे महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असल्याचे समोर आले आहे. महिलांनी आपले अनुभव सांगताना अनेक गंभीर मुद्दे मांडले. महिलांसाठी स्वतंत्र आसन व्यवस्था असली तरी अनेक वेळा त्या जागांवर पुरुष प्रवासी बसलेले असतात. जागा सोडण्यास सांगितल्यास वाद घालणे किंवा “राखीव जागा फक्त बस सुरू होण्याच्या ठिकाणापर्यंतच असते” अशी उत्तरे दिली जात असल्याची तक्रार महिलांनी केली. तसेच गर्दीचा फायदा घेत महिलांच्या मागे उभे राहणे, केसांना हात लावणे, मुद्दाम स्पर्श करणे, अश्लील नजरेने पाहणे असे प्रकार होत असल्याचा आरोपही महिला प्रवाशांनी केला आहे. त्यामुळे महिलांसाठी सुरक्षित आणि स्वतंत्र बससेवेची मागणी आता अधिक जोर धरू लागली आहे. ज्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्या मार्गांवर महिलांसाठी स्वतंत्र बस सुरू करणे आवश्यक आहे. तसेच बसमध्ये आणि बसस्टॉपवर सीसीटीव्ही, सुरक्षा कर्मचारी आणि कठोर कारवाईची व्यवस्था करण्याची मागणीही महिला प्रवांशानी केली आहे. नागरिकांच्या प्रमुख मागण्या सर्व बसस्टॉपची नियमित स्वच्छता करावी रात्री पुरेशी प्रकाश व्यवस्था बसवावी बसस्टॉपवर सीसीटीव्ही आणि सुरक्षा रक्षक नेमावेत मद्यप्रेमी आणि असामाजिक घटकांवर कारवाई करावी हिंजवडी फेज २ आणि गावठाण येथे सुसज्ज बसस्टॉप उभारावेत महिलांसाठी गर्दीच्या मार्गांवर स्वतंत्र बस सुरू कराव्यात महिला सुरक्षेसाठी विशेष पथक आणि हेल्पलाइन कार्यान्वित करावी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात असले तरी प्रवाशांना सुरक्षित, स्वच्छ आणि सन्मानजनक प्रवास मिळणे हीच आता सर्वात मोठी गरज बनली आहे. Pimpri-Chinchwad : साठ कोटींचा घोटाळा दाबला ! चौकशी समितीचा अहवाल समोर