– एम. डी. पाखरे
आळंदी – दहा बाय बाराची केबिन…. या केबिनला चारही बाजुंनी पाण्याच विळखा… बंद असलेला फॅन… तर वीज मीटर पाणी टपकत असल्याने त्यावर ठेवलेला पुठ्ठा… अशा नरकयाताना आळंदीत पीएमपीचे कर्मचारी वर्षांनुवर्षे भोगत असून पीएमपी प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असून कोणाचा जीव गेल्यावरच जागे होणार आहे का? असा संतप्त सवाल प्रवाशांसह कर्मचाऱ्यांनी उपस्थित केला आहे.
पीएमपीला सर्वाधिक नफा देणारा मार्ग म्हणून आळंदीचा मार्ग गणला जातो. येथ 30 वर्षांपासून पीएमपीचे स्थानक आहे; मात्र येथील स्थानकांत प्रवाशांना आजतागयत बसण्यासाठी पुरेशी जागा, निवारा शेड नसल्याने प्रवशांना ऊन, वारा, पावसाचा सामना करीत बसची वाट पाहत ताटकळत उभे राहवे लागते. तर वाहतूक नियंत्रक, वाहक-चालक व इतर कर्मचाऱ्यांच्यासाठी एक दहा बाय बाराची केबिन गेली दहा-बारा वर्षांपासून बसवली आहे. तिची अवस्था अतिशय दयनीय झाली असूनही ते आपली सेवा बजावत आहे. बसस्थानकाच्या आवारात विविध व्यावसायिकांच्या टपऱ्या दुचाकी वाहने वेळप्रसंगी चावचाकी वाहने आत अतिक्रमण करून बस स्थानकात आणली जातात. तसेच रिक्षावाले, सहा असनीवाले प्रवासी भरण्यासाठी बस जिथून बाहेर पडते तेथेच आपली वाहनेआडवी लावली जातात त्यामुळे चालकांना बस बाहेर नेताना कमालीची कसरत करावी लागते. खासगी वाहनांना किमान दोनशे मीटर बाहेर प्रवेश द्यावा असा शासनाचा जीआर आहे तरी देखील ही खासगी वाहने बस स्थानकात सर्रासपणे वावरत असूनही प्रशासन गप्प कसे? असा सवला प्रवाशांनी उपस्थित केला आहे.
महिलांचे स्वच्छतागृह टाळेबंद
बसस्थानकावर जागा अपुरी असून, पुरेशा प्रमाणात वीजपुरवठा केला जात नाही. रात्री-अपरात्री चोरीचे प्रकार घडतात. येथे रात्री दोन बसेस मुक्कामी असतात त्या बसचालक-वाहकांना झोपण्यासाठी निवारा शेड नाही. बस स्थानकावर पालिकेने शौचालय बांधले खरे; परंतु ते “असून नसल्यासारखे आहे’ तर महिलांच्या स्वच्छतागृहाला तर टालेच ठोकले असल्याने महिला प्रवाशांची मोठी कुंचबणा होत आहे.
नवीन केबीन उद्घाटनाच्या प्रतीक्षेत
वाहक-चालक, वाहतूक नियंत्रक व कर्मचाऱ्यांना बसण्यासाठी नवीन केबिन आणून ठेवले आहे मात्र, या उद्घाटनाला कोण मंत्री येतोय याकडे डोळे दिपून बसावे लागले आहे. सध्यातरी हे कर्मचारी नवीन केबिन असूनही गळक्या केबिनमध्येच नियमीत कारभार करीत आहे. आम्ही अजुन किती दिवस हा त्रास सहन करायचा असा सवाल वाहतूक नियंत्रक आणि कर्मचाऱ्यांकडून केला जात आहे.