पुणे – लॉकडाऊनमध्ये पाच महिने बंद असणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपी) सेवा मागील आठवड्यात सुरू झाली. प्रवासी सेवा पूर्ववत झाली असताना, बसेसच्या “ब्रेकडाऊन’चे प्रमाणदेखील पूर्ववत झाले आहे. पूर्वीप्रमाणे मागील आठवडाभरात बसेस ब्रेकडाऊन होत आहे. रोज सरासरी 30 बसेसचे ब्रेकडाऊन होत आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 3 सप्टेंबरपासून पीएमपीचे चाक पुन्हा मार्गावर आले. शहरातील 191 मार्गांवर 421 बसेस सोडण्यात येत आहेत. पाच महिने सेवा बंद असल्याने गाड्यांची तपासणी आणि दुरुस्ती करून बस मार्गावर सोडण्यात येत असल्याचे प्रशासनाने सांगितले होते.
मात्र, प्रत्यक्षात आठ दिवसांत दररोज सरासरी 30 बसेस बंद पडत आहे. त्यामुळे 25 टक्के बसेस रस्त्यावर असताना गाड्या बंद पडत असल्याने प्रवाशांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासह प्रवाशांकडून ब्रेकडाऊनसाठी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात येत आहे.
शहरात 191 मार्गांवर 421 बसेसच्या माध्यमातून सेवा देण्यात येत आहे. 3 ते 7 सप्टेंबर या कालावधीत सुमारे 164 गाड्यांचे ब्रेकडाऊन झाले. परंतु, बसेस एका ठिकाणी उभ्या होत्या. त्यामुळे ही समस्या आहे. अनेक बसेसच्या चाकांमुळे समस्या उद्भवत आहे. याशिवाय, मोठ्या संख्येने बॅटरीची देखील आवश्यकता आहे. यासह ब्रेकडाऊन कमी होण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे पीएमपीच्या तांत्रिक विभागाकडून सांगण्यात आले.