गैरअर्थ काढून खोडसाळपणा केला जात असल्याचा केला आरोप
नवी दिल्ली – चीनने भारतीय हद्दीत एक इंचही अतिक्रमण केलेले नाही आणि एकही भारतीय चौकी त्यांनी ताब्यात घेतलेली नाही या पंतप्रधान मोदींनी केलेल्या वक्तव्या विषयी देशात मोठेच वादंग निर्माण झालेले आहे. केंद्र सरकारच्याच विदेश मंत्रालयाने या संबंधात जे निवेदन केले होते त्याच निवेदनाला मोदींच्या वक्तव्यातून छेद दिला गेला असल्याची बाब समोर आल्यानंतर कॉंग्रेससह अन्य राजकीय पक्षांनी मोदींवर जोरदार निशाणा साधला होता.
या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान कार्यालयातर्फे मोदींच्या वक्तव्यावर खुलासा करून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उलट या विधानातून गैरअर्थ काढून खोडसाळपणा केला जात असल्याचा प्रतिहल्लाही या खुलाशातून करण्यात आला आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत प्रत्यक्ष ताबा रेषेनजिक काही बांधकाम करण्याचा प्रयत्न केला होता तो हाणून पाडताना भारतीय सैनिकांनी बलिदान दिले आहे. त्यांनी हा प्रयत्न विफल ठरवला आहे. ज्यांनी आपल्या हद्दीत येऊन काही आगळीक करण्याचा प्रयत्न केला त्यांना आपल्या भूमिपुत्र शूर सैनिकांनी चोख धडा शिकवला आहे, आपल्या देशाचे संरक्षण करण्यासाठी आपली सेना दले कोणतीही कसर बाकी सोडणार नाहीत, अशी ग्वाही मोदींनी त्या वक्तव्यात दिली होती, असेही पीएमओच्या खुलाशात नमूद करण्यात आले आहे. पंतप्रधानांनी काल सर्व पक्षीय बैठकीत जी काही वक्तव्ये केली त्याला वेगळे वळण देऊन काही जण खोडसाळपणा करीत आहेत, असा दावाही यात करण्यात आला आहे.