नवी दिल्ली : पंजाब महाराष्ट्र सहकारी बॅंक घोटाळा प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. ईडीने या घोटाळा प्रकरणी आतापर्यंत 3 हजार 830 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता जप्त केली असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये स्थावर आणि जंगम मालमत्ता यांचा समावेश असल्याची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
या घोटाळा प्रकरणी एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान, त्यांचा मुलगा सारंग वाधवान आणि पीएमसी बॅंकेचे अध्यक्ष वरयाम सिंग यांच्याविरोधात ईडीने कारवाई केली आहे. जप्त केलेल्या मालमत्तेत दोन विमाने, महागड्या गाड्या, क्रुझ, दागिने यांचा समावेश आहे. मनी लॉंड्रिंग प्रतिबंध कायद्याअंतर्गत ही जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या या तिघांच्या पोलिस कोठडीत 16 ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, आरबीआयने पीएमसी बॅंकेतून पैसे काढण्याची मर्यादा वाढवून 40 हजार रुपये केली आहे. त्यामुळे ग्राहक सहा महिन्याच्या कालावधीत 40 हजार रुपये काढू शकणार आहे. आतापर्यंत ही मर्यादा 25 हजार रुपये होती.