आरबीआय कार्यालयासमोरही केले धरणे आंदोलन
मुंबई: पीएमसी बॅंक घोटाळ्यातील आरोपींवर कारवाई व्हावी. तसेच सर्व खातेधारकांचे पैसे लवकरात लवकर परत मिळावेत, या मागण्यांसाठी पीएमसी बॅंकेच्या खातेधारकांनी “मातोश्री’बाहेर ठिय्या आंदोलन केले. तसेच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या कार्यालयासमोरही धरणे आंदोलन सुरु केले आहे. “आरबीआय चोर है’ अशा घोषणा देत आंदोलक आक्रमक झाले आहेत.
मागील सात दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात पीएमसी खातेधारकांचे आंदोलन सुरु आहे. आझाद मैदानात सुरु असलेल्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्यामुळे पीएमसी बॅंकेच्या खातेधारकांनी आज आरबीआयच्या कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले. तरीही शासनाकडून कारवाई होत नाही, असा आरोप आंदोनकर्ते पीएमसी खातेधारक करत आहेत.
पीएमसी बॅंक घोटाळ्यातील आरोपींवर लवकरात लवकर कारवाई केली जावी. तसेच सर्व खातेधारकांचे पैसे लवकरात लवकर त्यांच्या बॅंक खात्यात जमा करण्यात यावेत, या आंदोलनकर्त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत. आज आरबीआयच्या कार्यालयासमोर केलेल्या आंदोलनात मोठ्या प्रमाणात पीएमसी बॅंक खातेधारक सहभागी झाले होते. पीएमसी बॅंकेतील घोटाळ्याबाबत आरबीआयला 2011 पासूनच माहिती होती. तरीदेखील त्यांनी कारवाई केली नाही, असा आरोपदेखील आंदोलकांनी यावेळी केला.
दरम्यान, पीएमसी बॅंक प्रकरणात गेल्या आठवड्यात तीन माजी संचालकांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. मुक्ती बाविसी, तृप्ती बने आणि जगदीश मोखे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. या तीन अटकेनंतर पीएमसी बॅंक घोटाळा प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्यांची संख्या 12वर पोहोचली आहे.