पुणे – सलग 18 व्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने पंतप्रधानांनी आता “मन की बात’मध्ये पेट्रोल दरवाढीवर बोलावे, अशी मागणी माजी आमदार मोहन जोशी यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली.
पंतप्रधान राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय विषयांबरोबरच अगदी छोट्याशा गावातील स्तुत्य उपक्रमांची नोंद घेऊन त्याचाही उल्लेख “मन की बात’मध्ये करतात. या कार्यक्रमासाठी विषय सूचवण्याचे आवाहनही ते करतात. यावेळी देशाला भेडसावणाऱ्या पेट्रोल-डिझेल किंमतीमध्ये होणाऱ्या वाढीबद्दल त्यांनी बोलावे असे लोकांनी त्यांना सूचवायला हवे, असे जोशी म्हणाले.
डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली युपीएचे सरकार असताना कच्च्या तेलाचे भाव प्रति बॅरल 164 डॉलरपर्यंत पोहोचले होते, अशा परिस्थितीतही त्यांनी पेट्रोलियम पदार्थांच्या किमती स्थिर ठेवून जनतेवर जादा बोजा पडणार नाही याकडे लक्ष दिले होते, असे जोशी म्हणाले. पेट्रोल, डिझेल किंमती वाढल्या की अन्नधान्य आणि अन्य वस्तूंच्या किंमतीही वाढतात. करोना संकट काळात समाजातील प्रत्येक घटक आर्थिकदृष्ट्या विवंचनेत सापडला आहे. त्याला हा महागाईचा भार सहन होणारा नाही हे लक्षात घेऊन मोदी सरकारने जनतेला दिलासा देण्याऐवजी इंधनवाढीचे चटकेच दिले आहेत, अशी टीकाही जोशी यांनी केली.