मुंबई – ही निवडणूक फक्त सरकार निवडण्यासाठी नाही, भारताची दिशा ठरवणारी ही निवडणूक आहे. पर्याय निवडण्याची नाही, संकल्प करण्याची निवडणूक आहे. गरीबी हटाओचं खोटं आश्वासन देण्याची नाही, गरीबाला नवी संधी देण्याची निवडणूक आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं.
ते मुंबईतील बीकेसीतील सभेत प्रचारसभेला संबोधित करताना बोलत होते. मुंबईत लोकसभेच्या सहा जागा आहेत. या सर्व जागांसाठी 29 एप्रिलला मतदान होतंय. त्यासाठी शिवसेना आणि भाजपने जंगी सभांचं आयोजन केलं. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते.
यावेळी नरेंद्र मोदी यांनी मुंबादेवी, सिद्धिविनायक, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना वंदन करुन मराठीतून भाषणाला सुरूवात केली. तसेच उद्धव ठाकरेंचा लहान भाऊ असा उल्लेख केला.
नरेंद्र मोदी यांच्या सभेतील महत्वाचे मुद्दे –
-पहिल्यांदा मतदान करणारा आणि विसाव्या शतकातला मतदार मोदींच्या मागे का उभा आहे हे विरोधकांना समजत नाही, नवा मतदार त्यांची स्वप्न घेऊन उभा आहे
-कोणतेही सर्व्हे पाहा, एका गोष्टीवर एकमत आहे, की भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, पण चर्चा एकाच गोष्टीवर आहे, की भाजप त्यांचा 282 चा विक्रम मोडणार, की त्यापुढे जाणार
-देशातली हवा मुंबईकरांना लवकर समजते, देशातली हवा भाजपसोबत, काँग्रेसची स्थिती विदारक, कोणाचाही विश्वास नाही
-छोटा विचार करण्याची माझी सवयच नाही, त्यामुळेच आयुष्मान भारत ही योजना आणली, अमेरिका, मेक्सिको, कॅनडा या देशांची लोकसंख्या आहे तेवढ्या लोकांना या योजनेचा फायदा होतोय
-काँग्रेसचे जबाबदार नेते मध्यमवर्गीयांना स्वार्थी, लालची म्हणतात, पण या देशासाठी मध्यमवर्गीयांचं काय योगदान आहे, ते आम्ही दाखवून दिलं, काँग्रेसच्या ढकोसलापत्रात (जाहीरनामा) मध्यमवर्गीयांसाठी एकही आश्वासन नाही.
-काँग्रेस एका कुटुंबाच्या पिढीला वाचवण्यासाठी मध्यमवर्गावर ओझं टाकण्याचं नियोजन करत आहे
-2014 मध्ये तुम्ही मला पंतप्रधान केलं, मोठ्या मोठ्या नामदारांना मी जेलच्या दरवाजापर्यंत नेलं, 2019 मध्ये संधी द्या, आत टाकतो, ज्यांनी देशाला लुटलंय, त्यांना त्याची फेड करावीच लागेल.
– वेगवान विकास आणि सर्वात कमी महागाई दर हे गेल्या 30 वर्षात पहिल्यांदा झालंय, आरोग्य क्षेत्रातील दरही कमी झाले, औषधांचे दर कमी केले, सामान्य कुटुंबाला याचा फायदा झाला
-आज व्हॉईस कॉलिंग जवळपास मोफत आहे, डेटा तर भारतात सर्वात स्वस्त आहे, सरकारच्या निर्णयांचा हा परिणाम आहे
-मुंबईवर हल्ले काँग्रेसच्याच काळात झाले, पण हल्ल्यानंतर ते फक्त मंत्री बदलायचे
-मुंबई पोलिसांनी अनेक मोठ्या घटनांना तोंड दिलं आणि देशासाठी बलिदानही दिलं
-पोलिसांना बदनाम करण्याची फॅशन झालीय, पण प्रत्येक क्षणाला पोलीस सेवेत असतात, सण असो, उत्सव असो, त्याच्या कुटुंबात कुणी आजारी असो, पोलीस तुमच्या सेवेत हजर असतो
-33 हजार पोलिसांनी आपल्यासाठी बलिदान दिलं, पण काँग्रेसने त्यांना कधी सन्मान दिला नाही, या सरकारने नव्या पिढीला प्रेरणा देणारं स्मारक तयार केलंय, तुम्ही कधी दिल्लीला आलात तर महाराष्ट्र पोलिसांची यादी पाहा आणि श्रद्धांजली वाहून या
-मी छत्रपतींचा मावळा आहे, शत्रूंना घरात घुसून मारु, हे आम्ही जाहीरपणे सांगितलंय आणि करुन दाखवलं, हल्ल्यानंतर गृहमंत्री बदलण्याची परंपरा आम्ही बदलली आहे
-आयपीएलसाठी काँग्रेसने 2009 आणि 2014 मध्ये हात वर केले, हा आपल्या सुरक्षा दलांचा अपमान होता, आज लोकसभा निवडणूकही होत आहे आणि आयपीएलही सुरु आहे, पोलीस तर तेच आहेत, पण तुम्ही काय करत होते?