नवी दिल्ली- पीएम केअर्स फंडातून मुलांना निधी वितरीत करण्याच्या एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, मुलांना यापुढील काळात उच्च शिक्षण, आणि अभ्यासक्रमासाठी कर्ज हवे असल्यास त्यांना पीएम केअर्स मधून ते उपलब्ध करून दिले जाईल.
करोनामुळे निराधार झालेल्या मुलांना दरमहा चार हजार रूपये दिले जातील, तसेच वयाची 23 वर्ष पुर्ण केल्यानंतर या मुलांना दहा लाख रूपयांची मदत उपलब्ध करून दिली जाईल. तसेच त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आयुष्यमान भारत योजनेचे कार्डही त्यांनी प्रदान केले.
मोदी म्हणाले की, करोनाच्या काळात देशभर मोठी नकारात्मकता निर्माण झाली होती पण भारत धैर्याने या वातावरणातून बाहेर आला. भारता सारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशातील लोकांचे लसीकरण करण्याचा मोठा कार्यक्रमही आम्ही हाती घेतला. आमच्या सरकारने विविध क्षेत्रात गेल्या आठ वर्षात जी उंची गाठली आहे त्याची कोणी कल्पनाही करू शकत नाही असा दावाही त्यांनी केला.
या कामांमुळे जागतिक स्तरावर भारताची शक्ती वाढली आहे आणि भारताची प्रतिमाही उजळली आहे असे ते म्हणाले. भारताच्या या प्रवासात देशातील युवक वर्ग पुढे येत आहे असे नमूद करून त्यांनी त्याबद्दल समाधान व्यक्त केले. देशात तंत्रज्ञानाचा वापर करून गरीबांना त्यांचे अधिकार देण्याचे काम केले जात असल्याचेही मोदींनी यावेळी नमूद केले.