नवी दिल्ली – गेल्या वर्षी भारताने करोनाला ज्याप्रकारे पराभूत केले होते, त्याप्रमाणे यावेळीही देश करोनाला हरवेल. करोनाबाबतच्या सर्व नियमांचे पालन करून भारत वेगाने आणि समन्वयाने यशाची पुनरावृत्ती करु शकेल. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
महाराष्ट्र, छत्तीसगड तसेच इतर काही राज्यात करोना लसीचा तुडवडा आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पीएम मोदी बंगाल निवडणुकीत व्यस्त आहेत. मेडिकल सुविधा, ऑक्सिजन च्या मुद्यांवर बोलण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ नाही असा आरोप केला होता. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी रात्री करोना लसीकरण मोहिम संदर्भात व्हिडीओ काॅन्फरन्स द्वारे उच्चस्तरिय आढावा बैठक घेतली.
यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उच्चस्तरिय बैठकीत टेस्टिंग वाढवणे, रुग्णालयात बेड्स वाढविणे, रेमडेसिविर आणि इतर औषधांचा पुरवठा करणे, लसीकरण महिम पूर्ण क्षमतेने राबवणे या विषयांवर चर्चा केली. रुग्णालयात वैद्यकीय ऑक्सिजन प्लांट उभारण्याच्या कामाला गती देण्याचे, लस उत्पादन क्षमता पूर्ण ताकदीने वाढविण्याचे निर्देश दिले. तसेच गेल्यावर्षी ज्याप्रमाणे देशाने करोनाला हरवले त्याप्रमाणेच यावेळीही देश करोनासंबंधी नियमांचे पालन करून वेगाने आणि समन्वयाने यशाची पुनरावृत्ती करेल असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.
या बैठकीत अनेक मंत्रालयांच्या उच्च अधिकाऱ्यांनी देशातील कोरोना विषाणूची स्थिती आणि लसीकरण मोहिमेच्या प्रगतीबाबत आपला अहवाल सादर केला. शुक्रवारी पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या प्रश्नावर अनेक वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांशी संवाद साधला. तसेच कोरोना रूग्णांच्या आवश्यक वैद्यकीय ऑक्सिजनच्या वाढत्या मागणीवर चर्चा केली. केंद्राने यापूर्वी 50 हजार मेट्रिक टन वैद्यकीय ऑक्सिजन आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. याव्यतिरिक्त, पीएम कॅरेस फंड अंतर्गत 100 नवीन रूग्णालयात ऑक्सिजन प्लांट स्थापित करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.