सहा राज्यांतल्या 116 जिल्ह्यांसाठीची ग्रामीण रोजगार योजना
नवी दिल्ली – केंद्र सरकारने स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावातच रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या एका नवीन योजनेला आजपासून प्रारंभ केला असून त्याचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. गरीब कल्याण रोजगार अभियान या नावानेही ही रोजगार योजना सुरू करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले की, या मजुरांनी आतापर्यंत शहरांचा विकास करण्यासाठी योगदान दिले. आता ते आपल्या गावाचा विकास करण्यासाठी योगदान देतील. आतापर्यंत या मजुरांचे कष्ट आणि कौशल्य केवळ शहरांच्या विकासाच्या कामी येत होते, आता ते गावाच्या विकासात कामी येणार आहे. ग्रामीण भागातील गावांनी करोनाच्या विरोधात जो लढा दिला तो शहरांसाठीही आदर्श ठरणार आहे, असे त्यांनी नमूद केले.
आज सुरू करण्यात आलेल्या अभियानातून आता ग्रामीण भागात पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरित मजुरांचे हित केंद्र सरकारच्या पूर्ण लक्षात होते. असे नमूद करून ते म्हणाले की, त्यांना आता त्यांच्या घराजवळच रोजगाराची संधी निर्माण करून गावांचाही विकास आम्ही साधणार आहोत. आज गावांमध्ये पहिल्यांदाच इंटरनेट सेवेचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. त्यामुळे आता इंटरनेटचा स्पीडही वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोदींनी चीन सीमेवर शहीद झालेल्या बिहार रेजिमेंटच्या जवानांना आदरांजली वाहिली.
पंतप्रधानांनी आज बिहारमधील कटिहार गावात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या योजनेला प्रारंभ केला. त्यावेळी बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, झारखंड या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. देशातल्या सहा राज्यांतील 116 जिल्ह्यांमध्ये ही योजना लागू केली जाणार आहे. याच भागात स्थलांतरित मजूर शहरांतून आपल्या मूळ गावी परत आले आहेत.