नवी दिल्ली, दि. 25 – पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, 26 तारखेला दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर जाणार आहेत. 1971 मध्ये भारत पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धानंतर बांगलादेश मुक्त झाला. त्याला यंदा 50 वर्ष पूर्ण होत आहेत.
त्यानिमित्त 26 आणि 27 मार्च रोजी बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी बांगलादेशला भेट देणार आहेत. वंगबंधू शेख मुजीबुर रहेमान यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे.
नुकताच भारतातर्फे देण्यात येणारा गांधी शांतता पुरस्कार रहेमान यांना जाहीर झाला आहे. भारतबांगलादेश दरम्यानच्या द्विपक्षीय संबंधांच्या दृष्टीनं मोदी यांची ही भेट महत्त्वपूर्ण ठरेल, असे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांनी काल नवी दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. या दौऱ्यात सुरक्षा, आर्थिक भागीदारी यासह अन्य महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होण अपेक्षित आहे.
बंगबंधू हे गेल्या शतकातील एक महान नेते होते, ज्यांचे जीवन आणि आदर्श लाखो लोकांना आजही प्रेरणा देत आहेत. त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली वाहण्यासाठी तुंगिपारामध्ये बंगबंधूंच्या समाधीला भेट देण्यास आपण उत्सुक आहोत, असे पंतप्रधानांनी या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच्या निवेदनात म्हटले आहे.