कोलकाता – महाचक्रीवादळ अम्फनने रौद्र रूप धारण केले असून या वादळामुळे आतापर्यंत राज्यातील ७२ जणांना आपले प्राण गमवावे लागल्याची माहिती पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिली. यावेळी बोलताना बॅनर्जी यांनी, ‘ महाचक्रीवादळ अम्फन ही आपण आतापर्यंत पाहिलेली सर्वात मोठी आपत्ती असून आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राज्याला भेट देऊन येथील परिस्थिची पाहणी करण्याबाबत विचारणा करणार आहोत’ असे देखील सांगितले.
दरम्यान, या महाचक्रीवादळ अम्फनमध्ये जीव गमावलेल्या राज्यातील नागरिकांच्या नातेवाईकांना राज्य सरकारतर्फे प्रत्येकी २.५० लाखांची मदत केली जाणार असल्याची घोषणा देखील मुख्यमंत्री मनात बॅनर्जी यांनी केली. यापूर्वी त्यांनी अम्फन महाचक्रीवादळ हे कोरोना पेक्षाही भयानक संकट असल्याचे म्हंटले होते.
I have never seen such a disaster before. I will ask PM to visit the state and see the situation: West Bengal Chief Minister Mamata Banerjee #CycloneAmphan https://t.co/eFrF09DtqL
— ANI (@ANI) May 21, 2020
तत्पूर्वी, पश्चिम बंगालमधील दिघा व बांगलादेशातील हातिया येथे वादळाने बुधवारी दुपारी २.३० वाजता जमिनीला स्पर्श केला होता. त्यानंतरच्या झंझावातात अनेक झाडे, घरे उन्मळून पडली होती. विद्युत खांबही कोसळलेहोते. या वादळापासून रक्षा करण्यासाठी सुमारे ६ लाख ५८ हजार लोकांना दोन राज्यात सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. अम्फन वादळाचा वेग सुरुवातीला ताशी १६०-१७० किमी होता तो नंतर १९० कि.मी इतका झाला होता.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे प्रमुख एस.एन प्रधान यांनी अम्फनबाबतच्या उपाययोजनांची माहिती देताना, ओडिशात २० पथके रस्ते मोकळे करण्याचे काम करीत असून पश्चिम बंगालमध्ये १९ पथके लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवत आहेत. दिघा येथे वादळाने भरतीच्या मोठ्या लाटा आल्या. अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होऊन कच्ची घरे कोसळली, झाडेही पडली आहेत. अशी माहिती दिली होती.