नवी दिल्ली – गुरूकुलाच्या वारशातून मिळालेल्या शिक्षणामुळे देशातील वैज्ञानिक संस्थांनाही तेथील विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचे बळ लाभले आहे. अशा प्रकारचे शिक्षण देणाऱ्या संस्था देशाचे वैभव आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. मोदी यांनी शनिवारी गुजरातमधील राजकोट येथील श्री स्वामीनारायण गुरूकुल संस्थेला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित कार्यक्रमाला व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते. त्यांनी म्हटले आहे की गौरवशाली भूतकाळ आणि त्याचा शिक्षण व्यवस्थेत समावेश करून ही संस्था भारताच्या पुनरुज्जीवनासाठी उत्कृष्ट काम करत आहे.
भूतकाळातील कॉंग्रेस सरकारांची खिल्ली उडवत मोदी म्हणाले, “जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारताचे प्राचीन ‘वैभव’ तिच्या शैक्षणिक व्यवस्थेत समाविष्ट करणे आणि आपल्या गौरवशाली भूतकाळाचे पुनरुज्जीवन करणे ही आपली जबाबदारी होती. पण गुलामगिरीची मानसिकता असलेले सरकार त्या दिशेने पुढे सरकले नाही. आता पुन्हा एकदा संत आणि आचार्यांनी राष्ट्राप्रती ही वेदनादायी जबाबदारी उचलली आहे, असे सांगून श्री स्वामीनारायण गुरूकुल हे या कार्याचे उत्तम उदाहरण आहे असे त्यांनी नमूद केले.
“गेल्या 75 वर्षांत, या गुरूकुलने विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण आणि मूल्ये देऊन त्यांचा सर्वांगीण विकास केला आहे, इस्रो ते भाभा अणुसंशोधन केंद्रापर्यंतच्या संस्थांना या गुरूकुलांच्या वारशामुळे प्रतिभेला बळ मिळाले आहे. गरीब विद्यार्थ्यांना मदत केल्याबद्दल गुरूकुलचे कौतुक करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, गरीब विद्यार्थ्यांना त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी गुरूकुल दररोज एक रुपया आकारते. त्यामुळे गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळण्यास मदत होते.
नालंदा आणि तक्षशिलासारख्या प्राचीन विद्यापीठांच्या वारशाचे स्मरण करून मोदी म्हणाले की, या संस्था प्राचीन काळातील गुरूकुलांच्या वैभवाचे उदाहरण आहेत. गार्गी आणि मैत्रेयी यांसारख्या महिला संतांनी दिलेल्या योगदानाचे स्मरण करून ते म्हणाले, “जेव्हा स्त्री-पुरुष समानतेसारख्या शब्दांचा जन्म झाला नव्हता, तेव्हाही आमचे गार्गी आणि मैत्रेयी सारखे संत शास्त्रांचा अभ्यास करत असत. ऋषी वाल्मिकींच्या आश्रमात, अत्रेयीदेखील शास्त्रांचा अभ्यास करत असत.