नवी दिल्ली – महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला देशभक्त म्हणवणाऱ्या भाजपा उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी आपल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत माफी मागितली आहे. या सगळ्या प्रकाराबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच उघडपणे बोलले आहेत.
मध्य प्रदेश इथला एका स्थानिक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मोदी यांनी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या वक्तव्याबद्दल आपला संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “गांधीजी किंवा गोडसेबाबत जी काही वक्तव्य केली आहेत, ती अत्यंत चुकीची आहेत. घृणास्पद आहेत. कुठल्याही सभ्य समाजात अशा प्रकारची वक्तव्य सहन केली जाऊ शकत नाहीत. त्यांनी माफी मागितली ती वेगळी गोष्ट आहे, मात्र मी माझ्या मनापासून त्यांना माफ करु शकत नाही”.
दरम्यान, भाजपची भोपाळची उमेदवार प्रज्ञासिंह ठाकूरने महात्मा गांधींचा हत्यारा नथुराम गोडसे देशभक्त होता, आहे आणि राहील असं म्हटलं होतं. तिच्या या वक्तव्याने देशभरात संतापाची लाट उठली. त्यानंतर प्रज्ञा ठाकूरने माफी मागितली.