मुंबई – 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक दिवस प्रेमवीरांसाठी अतिशय स्पेशल असतो. आठवड्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 14 फेब्रुवारीला ‘व्हॅलेंटाईन डे’ला पार्टनरप्रती असलेलं प्रेम व्यक्त केलं जातं. दरम्यान, पशु कल्याण मंडळाने व्हॅलेंटाईन डे ऐवजी 14 फेब्रुवारीला ‘काऊ हग डे’ साजरा करण्याची मागणी केली आहे. 14 फेब्रुवारीला गायींना मिठी मारून त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करावे आणि व्हॅलेंटाईन डे ऐवजी ‘काऊ हग डे’ साजरा करावा, अशी प्राणी कल्याण मंडळाने मागणी केली आहे. या प्रस्तावावर केंद्र सरकार सकारात्मक विचार करत असताना त्यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यावर आता शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून व्यक्त करण्यात आले आहे.
काय आहे सामनाचा अग्रलेख
देशात शेतकरी पशुधनाचा सांभाळ कसा करायचा, स्वतःच्या पोरांचे पोट भरायचे की पशुधनाचे या विवंचनेत आहे. त्याची ही विवंचना दूर करणे राहिले बाजूला, मोदी सरकार एकीकडे जनतेला ‘गाईला मिठी मारा’ असे फर्मान सोडते आहे आणि दुसरीकडे स्वतः ‘बिग बुल’ अदानी यांना मिठी मारून बसले आहे. अदानी हे शेअर बाजारातील ‘बिग बुल’ असले तरी मोदी यांच्यासाठी ते ‘होली काऊ’ आहेत. तसे नसते तर या ‘होली काऊ’साठी त्यांनी इतका आटापिटा केला नसता. इकडे गोमाता चारा-पाण्याशिवाय हंबरते आहे आणि मोदी सरकार ‘बिग बुल’च्या दाणापाण्याचे पाहात आहे, जनतेला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी गाईला मिठी मारायला सांगत आहे. चारा-पाण्याशिवाय हंबरणाऱ्या गाईला मिठी मारल्याने, उधळलेल्या ‘बिग बुल’च्या गुन्हय़ांची चौकशी मोदींचे सरकार करणार आहे काय?
‘‘अदानी अदानी’’ अशा घोषणा लोकसभा आणि राज्यसभेत सुरू असतानाही पंतप्रधान मोदी यांनी अदानी घोटाळय़ावर एक शब्दही उच्चारला नाही, पण अदानी घोटाळय़ांवर उतारा म्हणून मोदींच्या सरकारने 14 फेब्रुवारी रोजी ‘गाय आलिंगन दिन’ साजरा करण्याचे फर्मान सोडले. 14 फेब्रुवारी हा पश्चिमी देशांत ‘व्हॅलेंटाइन डे’ म्हणून साजरा केला जातो. हा प्रेम करण्याचा दिवस म्हणून जगभरातले प्रेमवीर आपापल्यापरीने साजरा करतात. या ‘व्हॅलेंटाइन डे’चे विकृतीकरण आपल्या देशात सुरू झाल्याने सुरुवातीच्या काळात हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्याला विरोधच केला होता.
पुढे बदलत्या जगाचे व काळाचे भान ठेवून प्रेमात मिठाचा खडा का टाकावा? ‘प्रेम हे प्रेम असते, तुमचे आमचे सेम असते’ या उक्तीने प्रेम करा, पण मर्यादा व संस्कृती सांभाळून, अशी भूमिका शिवसेनेने घेतली. मात्र मोदी सरकारने आता ठरवले आहे की, 14 फेब्रुवारी रोजी गाईवर प्रेम करा, गाईंना मिठी मारून त्यांच्यावरचे प्रेम व्यक्त करा. ‘व्हॅलेंटाइन डे’ऐवजी ‘काऊ हग डे’ साजरा करा. गाय ही हिंदुस्थानी संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा कणा आहे. ती कामधेनू आणि गोमाता म्हणून ओळखली जाते. गाईला मिठी मारल्याने भावनिक उन्नती होते. त्यामुळे गाईला मिठी मारा, असे फर्मान पशू कल्याण मंडळाकडून निघाले. अशा शब्दात सामानातून खडे बोल सुनावण्यात आले आहेत.
लोकांना अदानी घोटाळय़ावर पंतप्रधानांकडून स्पष्टीकरण हवे होते, पण मोदी सरकारने लोकांना पुन्हा एकदा धर्माच्या गुंगीचे औषध देऊन गप्प केले. मोदी संसदेत अदानींवर बोलले नाहीत व त्यांचे सरकार त्याच वेळी गाईवर बोलले. अदानी हे शेअर बाजारातील ‘बिग बुल’ आहेत. पंतप्रधान त्या ‘बिग बुल’ला मिठी मारून बसले आहेत. ती मिठी जराही सैल करायला ते तयार नाहीत. लोकांनी विचारले, त्या मिठीचे रहस्य काय? त्याचे उत्तर न देता त्यांनी फर्मान काढले, ‘‘लोकांनी गाईस मिठी मारावी.’’ भाजपचे व संघाचे हिंदुत्व हे असे आहे. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी पंधरा दिवसांपूर्वीच जयपुरात एक खळबळजनक विधान केले. त्यांनी सांगितले, ‘‘गोमांस खाणाऱ्यांनाही संघाचे दरवाजे उघडे आहेत.’’
म्हणजे गाईंना खाटीकखान्यात न्यायची परवानगीच संघाने दिली व इकडे मोदी सरकारने ‘काऊ हग डे’ म्हणजे गाईस मिठी मारण्याचे फर्मान सोडले. गोमांस खाणाऱ्यांना संघाचे दरवाजे उघडे असतील तर मग गोमांस खाण्यावरून लोकांच्या हत्या का घडवल्या? याचे उत्तर देशाला मिळायला हवे. या वर्षी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका आणि पुढील वर्षी लोकसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी जनतेकडे मते मागताना सांगण्यासारखे काहीच नसल्याने मोदी सरकार देशाला पुनः पुन्हा धर्म आणि भावनिक मुद्दय़ांमध्ये गुंतवीत आहे. हिंदू मतांसाठीच राममंदिर व गाईंचे राजकारण सुरू झाले आहे. गाय हे आपल्या संस्कृतीचे व धर्माचे प्रतीक जरूर आहे, पण गाईला मिठी मारल्यास अदानींसह सर्व महाघोटाळय़ांचे पाप धुऊन निघणार आहे काय? वीर सावरकर हे प्रखर हिंदुत्ववादी, पण सावरकरांचे गाईंबाबतचे विचार विज्ञानवादी होते.
गाय हा एक उपयुक्त पशू आहे, गोमाता नाही, हे मत त्यांनी परखडपणे मांडले. हे वीर सावरकर भाजप व संघ परिवारास मान्य आहेत काय? बरे, गाईला मिठी मारली की भावनिक उन्नती होते हे मोदी सरकारचे म्हणणे वादासाठी मान्य केले तरी हा प्रकार गाईलाही मान्य असायला हवा ना! भाजपच्याच एका नेत्याचा गाईला मिठी मारण्याचा प्रयत्न त्याच्या अंगाशी कसा आला, याचा एक व्हिडीओच सध्या समाजमाध्यमांवर फिरतो आहे. हा नेता गाईजवळ जाताच गाय त्याला लाथ मारण्याचा प्रयत्न करते, त्याला जवळ येऊ देत नाही, असे त्या व्हिडीओमध्ये दिसते. बहुधा, त्या गाईलाही ‘गाय आलिंगन दिवसा’चा ढोंगीपणा आणि त्यामागील स्वार्थी राजकारणाचा राग आला असावा! म्हणूनच तिने त्या नेत्याला जवळही फिरकू दिले नसावे. देशात शेतकऱ्यांची अवस्था बिकट आहे.
पशुधनाच्या चारा-पाण्याचे वांधे झाले. अस्मानी आणि सुलतानीच्या कचाटय़ात भरडून निघालेला शेतकरी पशुधनाचा सांभाळ कसा करायचा, स्वतःच्या पोरांचे पोट भरायचे की पशुधनाचे या विवंचनेत आहे. त्याची ही विवंचना दूर करणे राहिले बाजूला, मोदी सरकार एकीकडे जनतेला ‘गाईला मिठी मारा’ असे फर्मान सोडते आहे आणि दुसरीकडे स्वतः ‘बिग बुल’ अदानी यांना मिठी मारून बसले आहे. अदानी हे शेअर बाजारातील ‘बिग बुल’ असले तरी मोदी यांच्यासाठी ते ‘होली काऊ’ आहेत. तसे नसते तर या ‘होली काऊ’साठी त्यांनी इतका आटापिटा केला नसता. इकडे गोमाता चारा-पाण्याशिवाय हंबरते आहे आणि मोदी सरकार ‘बिग बुल’च्या दाणापाण्याचे पाहात आहे, जनतेला ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी गाईला मिठी मारायला सांगत आहे. चारा-पाण्याशिवाय हंबरणाऱ्या गाईला मिठी मारल्याने, उधळलेल्या ‘बिग बुल’च्या गुन्हय़ांची चौकशी मोदींचे सरकार करणार आहे काय? असं स्पष्ट मत सामानातून व्यक्त करण्यात आलं आहे.