कोलकाता – भारतीय जनता पार्टीच्या विरोधात सतत आक्रमक भूमिकेत असणाऱ्या प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सगळ्यांनाच चकित करणारे विधान केले आहे. त्यांनी केंद्रीय तपास संस्थांकडून केल्या जाणाऱ्या तपास प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली आहे. सरकारकडून या तपास संस्थांचा गैरवापर होत असल्याची देशभरातून ओरड सुरू असताना ममतांनी यात मोदींचा हात नसल्याचे म्हणणे राजकीय वर्तुळात सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकणारे ठरले. मात्र त्यांनी हा दोष भाजपच्या काही नेत्यांच्या माथी मारला आहे.
प. बंगाल विधानसभेत केंद्रीय तपास यंत्रणाच्या दुरूपयोगाच्या संदर्भात चर्चेला आज सुरूवात करण्यात आली. यावेळी ममता बॅनर्जी म्हणाल्या की ईडी आणि सीबीआय यांच्या भीतीने उद्योजक देशाबाहेर पळ काढत आहेत. या तपास संस्थांचा दुरूपयोग होतो आहे. मात्र पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचा त्याच्याशी काही संबंध नसावा असे आपले मानणे आहे.
केंद्रीय अन्वेषण विभाग आता पंतप्रधान कार्यालयाला रिपोर्ट करत नाही. आपल्यातील बहुतेक जणांना ही बाब माहिती नसावी. सीबीआय आता गृहमंत्रालयाला रिपोर्ट करते. भाजपचे काही नेते कारस्थान करत आहेत. काही नेते सातत्याने निजाम पॅलेस येथे जातात अशा शब्दांत ममतांनी गृहमंत्री अमित शहा यांचे नाव न घेता त्यांच्याकडे निर्देश केला आहे.
पंतप्रधानांची प्रशंसा करतानाच त्यांनी पंतप्रधानांच्या कथित सल्लागारांनाही यावेळी लक्ष्य केले. त्या म्हणाल्या की मी योग्य आदर राखून पंतप्रधानांना सल्ला देते. ते (मोदींचे कथित सल्लागार) पंतप्रधानांना सल्ला देतात की बंगालला दिला जाणारा निधी रोखा. मग चित्ते खरेदी करू नका, असा सल्ला ते का देत नाहीत? मी कालच पंतप्रधानांना शुभेच्छा दिल्या. मी त्यांना पुन्हा सल्ला देते की त्यांनी पक्ष आणि सरकार एक करू नये. प्रत्येकाचा फोन ट्रॅक केला जात असून पेगाससचा वापर करून आपण राष्ट्र नियंत्रित करण्याचा करत आहात.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांची प्रशंसा करून ममतादिदी आपल्या भाच्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी टीका भाजपचे नेते सुवेंदु अधिकारी यांनी केली आहे.
अधिकारी यांना केले लक्ष्य
आपल्या भाषणात ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्ष नेते सुवेंदु अधिकारी यांच्यावर टीका केली. अधिकारी एकेकाळी ममता यांच्या तृणमूल कॉंग्रेसमध्ये होते व ममता यांचे निकटवर्तीय होते. मात्र राज्य विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये दाखल झाले व त्यांनी ममतांचाच पराभवही केला. ममता या संदर्भात म्हणाल्या की जुना मित्र आता शत्रु बनला आहे. त्याच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप आहेत. मात्र त्याच्यावर तपास संस्थांनी किती वेळा छापे मारले असा सवाल त्यांनी केला.