मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केल्याची माहिती समोर आली आहे. रश्मी ठाकरे या सध्या करोना झाल्यामुळे मुंबईच्या एच.एन. रिलायन्स रुग्णालयात उपचार घेत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून रश्मी यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत.
रश्मी ठाकरे यांना 23 मार्च रोजी करोनाची लागण झाली होती. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरच त्यांनी स्वत: क्वारंटाईन करुन घेतले होते. त्यानंतर रश्मी ठाकरे यांना दोन दिवसांपूर्वी रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. महत्वाची बाब म्हणजे 11 मार्च रोजी रश्मी ठाकरे यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला होता.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रश्मी ठाकरे यांच्याबाबत केलेल्या फोनमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने एनडीएला सोडचिठ्ठी देत भाजपशी फारकत घेतली होती. त्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड वितुष्ट आले होते.
राज्यातील भाजप नेते ठाकरे सरकारला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडत नाहीत. सचिन वाझे आणि परमबीर सिंह लेटरबॉम्बवरुन हा वाद आणखी विकोपाला गेला होता. भाजप नेत्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाषा केली होती. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट उद्धव ठाकरे यांना फोन करणे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे.