नवी दिल्ली – मध्य प्रदेशातल्या पथ विक्रेत्यांबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘स्वनिधी संवाद’ साधला. कोविड-19 महामारीमुळे पथ विक्रेत्यांच्या व्यवसायावर खूप मोठा परिणाम झाला आहे, त्यांना आता पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत व्हावी, यासाठी सरकारने दि. 1 जून रोजी ‘प्रधानमंत्री स्वनिधी योजना’ सुरू केली.
या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी मध्य प्रदेशातल्या 4.5 लाख पथ विक्रेत्यांनी आपली नावे नोंदविली होती. त्यापैकी 1.4 लाख पथ विक्रेत्यांना मंजुरी देण्यात आली असून त्यांना व्यवसायासाठी 140 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
समाजातला आणखी एक असुरक्षित घटक म्हणजे पथ विक्रेते आहेत, हे जाणून त्यांच्यासाठी ही स्वनिधी योजना सुरू करण्यात आली आहे. यामुळे त्यांना आता पुन्हा आपली रोजीरोटी कमावणे शक्य होणार आहे. पथ विक्रेत्यांना इतक्या स्वस्त, कमी व्याजदरामध्ये भांडवल प्रथमच उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
विशेष म्हणजे या योजनेच्या माध्यमातून लाखो विक्रेते थेट विक्री प्रणालीशी जोडले गेले आहेत. त्याचा लाभ त्यांना मिळू शकणार आहे. स्वनिधी योजनेचे उद्दिष्ट पथ विक्रेत्यांना स्वरोजगार, स्वावलंबन आणि स्वाभिमान प्रदान करणे हा आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
या योजनेतून कर्ज घेणाऱ्या पथ विक्रेत्याने कर्जाची परतफेड वर्षभरामध्ये केली त्याला 7 टक्क्यांपर्यंत व्याजसवलत मिळू शकणार आहे. तसेच डिजिटल व्यवहार केले तर ‘कॅश बॅक’ची सवलत मिळू शकणार आहे. त्यामुळे या विक्रेत्याच्या खात्यामध्ये एकूण व्याजापेक्षा जास्त बचत जमा होईल.
पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थींना उज्ज्वला गॅस योजना, आयुष्मान भारत योजना अशा सुविधाही प्राधान्याने देण्यात येणार आहेत. प्रधानमंत्री जन धन योजनेतून देशामध्ये 40 कोटींपेक्षा जास्त गरीबांची बॅंकांमधून खाती उघडण्यात आली आहेत असेही पंतप्रधान म्हणाले.