खासदार सुप्रिया सुळे यांची टीका : विविध विषयांसाठी पालिका आयुक्तांची भेट
पुणे – केंद्रातील सरकार दडपशाही करणारे आहे. देशात इतका असंतोष असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्याच बोलण्यात तफावत येत असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. सीएए आणि एनआरसी लागू झाल्यानंतर भटक्या विमुक्तांनी काय करायचे, असा प्रश्न उपस्थित करत शाहीनबागला समर्थन देण्यासाठी दिल्लीला जाईन, असेही सुळे यांनी यावेळी सांगितले.
मतदार संघातील विविध प्रलंबित विषयांसाठी सुळे यांनी सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली. यावेळी सचिन दोडके, विशाल तांबे, राष्ट्रवादीचे अन्य नगरसेवक, नगरसेविका, महापालिकेतील सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यामध्ये सिंहगड रस्ता ते हडपसर सायकल ट्रॅकचा प्रस्ताव तीन वर्षांपासून पडून आहे, त्याचे काम पूर्ण करण्याची राज्य सरकारकडे मागणी करणार आहोत.
याशिवाय 24 तास समान पाणीपुरवठा योजना नव्याने समाविष्ट गावांसाठीही सुरू करावी, अशी मागणी सुळे यांनी केली. तर, महाआघाडी सरकारमध्ये आपापसांत मतभेद असल्याची टीका सातत्याने भाजपकडून केली जात आहे. पण, “राज्यसरकारमध्ये कोणतेही मतभेद नाहीत,’ असे सुळे यांनी स्पष्ट केले.