लॉकडाऊनमध्ये हॉटेल, उद्योगांकडून पाणी वापर कमी; शहर, उपनगरासाठी नियोजन
सिंहगड रोड – खडकवासला धरण साखळीतील धरणांतील पानशेत, वरसगाव आणि खडकवासला धरणांमध्ये एकूण 9.82 अब्ज घन फूट (टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे एक टीएमसी पाणीसाठा जास्त आहे. गेल्या वर्षी या सुमारास सुमारे नऊ टीएमसी पाणी शिल्लक होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॉटेल तसेच उद्योग क्षेत्रांतून पाण्याची मागणी कमी असली तरी शेतीसाठी पाणी आवर्तन सोडले जात असून आणखी दहा दिवस हे आवर्तन सुरू ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत सुमारे पाच टीएमसी पाणी सोडण्यात येणार असले तरी शहर तसेच उपनगरांकरिता उन्हाळी पाणी नियोजन करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या टेमघर वगळता खडकवासला धरण साखळीतील धरण धरण साखळीतील धरणांत चांगला पाणीसाठा आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत गेल्या दीड महिन्यांत शहरातील हॉटेल व्यावसाय तसेच अन्य उद्योगांकडून पाण्याचा वापर कमी झाला आहे. मात्र, शेतकऱ्यांकडून शेतीसाठी आवर्तनाची मागणी होऊ लागल्याने जलसंपदा विभागाकडून दि. 31 मार्चपासून 40 दिवसांचे उन्हाळी आवर्तन सुरू करण्यात आले आहे. कालवा समितीतील चर्चेनुसार दुसऱ्या उन्हाळी आवर्तनात सुमारे चार टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन असते परंतु, धरणांतील पाणीसाठा तसेच पावसाचा अंदाज लक्षात घेऊन दुसरे उन्हाळी आवर्तन सोडायचे की नाही, याचा निर्णय घेतला जाणार आहे. याकरिता ऑनलाइन विशेष बैठक होऊ शकते, असे सांगण्यात आले.
टेमघर रिकामेचा परिणाम नाही…
खडकवासला धरणात 1.29 टीएमसी, पानशेत धरणात 4.58 टीएमसी, वरसगाव धरणात 3.95 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. टेमघर धरण दुरुस्तीसाठी रिकामे करण्यात आले असल्याने या धरणांत पाणी नाही. परंतु, लॉकडाऊनमुळे पाण्याचा वापर शहरांत कमी झाल्याने टेमघर धरणांत पाणी नसतानाही शहराकरिता पाणी नियोजन योग्य पद्धतीने करता आले.
शेतीसाठी मुठा उजव्या कालव्यातून आणखी 10 दिवस आवर्तन सुरू ठेवण्यात येणार आहे. पहिल्या आवर्तनात पाच टीएमसी पाणी सोडण्याचे नियोजन आहे. शहराकरिता पाणी नियोजन पाहून दुसरे उन्हाळी आवर्तन द्यायचे की नाही, याबाबत निर्णय होईल.
– विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग