नवी दिल्ली : देशात कोर्टोनच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातला आहे. त्यामुळे आरोग्य सुविधांचा तुटवडा निर्माण होत आहे. ऑक्सिजनअभावी होणारे मृत्यू सध्या सर्वात मोठा चिंतेचा विषय ठरत असून देशभरातून मदतीसाठी आवाहन केले जात आहे. शनिवारी दिल्लीमधील बत्रा रुग्णालयातील १२ रुग्णांचा मृत्यू झाला. तर सोमवारी कर्नाटकात अनेक रुग्णांनी आपले प्राण गमावले. यासंबंधी एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिल्लीतील एका रुग्णालयाचे वैद्यकीय संचालकांसोबत चर्चा केली आहे त्यावेळी त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.
“सरकार गेल्या १४ महिन्यात नेमकं काय करत होतं? कोणीही काहीही शिकलेले नाही. मेकशिफ्ट रुग्णालले हा पर्याय नाही. तुम्ही तिथे ऑक्सिजन पाठवत आहात, पण नीट उभारण्यात आलेली रुग्णालले नाहीत. कृपया आम्हाला ऑक्सिजन द्या, त्यासाठी आम्हाला भीक मागायला लावू नका, प्रत्येत १० ते १२ रुग्णालयांसाठी नोडल अधिकारी असला पाहिजे. आपतकालीन परिस्थितीत १५ ते २० मिनिटांत ऑक्सिजन उपलब्ध झाला पाहिजे जेणेकरुन लोकांना जीव गमावावा लागणार नाही,” असेही ते म्हणाले आहेत.
“माझ्या आयुष्यातली ही सर्वात मोठी शोकांतिका आहे. ऑक्सिजन नसल्याने रुग्णांचा मृत्यू होत आहे. करोना रुग्णावर उपचार करताना ऑक्सिजन, औषधं आणि लसीकरणाची गरज आहे. पण यापैकी काहीच उपलब्ध नाही. सरकार म्हणतं देशात ऑक्सिजनचा मुबलक साठा शिल्लक आहे. पण रुग्ण मरत आहेत. न्यायपालिका की प्रशासन? हा देश नेमकं कोण चालवत आहे माहिती नाही,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
कर्नाटक सरकारच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य असणारे डॉक्टर विशाल राव यांनी राज्यात आरोग्यासंबंधी उत्तम पायाभूत सुविधा असल्याचं म्हटलं आहे. राज्यातून देशभरात पुरवठा केला जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. पण कर्नाटकमध्येच मागणीत दुपटीने वाढ झाली असल्याने समस्या निर्माण झाल्याचं ते म्हणाले आहेत. याशिवाय वाहतूक एक मोठी समस्या असल्याचा उल्लेख त्यांनी केला. “उत्पादकांना सर्व राज्यांसाठीचे वाटप वाढवावे लागतील, तरच ही समस्या दूर होईल. त्यांना वाहतुकीसाठीदेखील पाठबळ दिले पाहिजे. ऑक्सिजन घेऊन जाणाऱ्या वाहनांसाठी ग्रीन कॉरिडोर आवश्यक आहेत,” असे ते म्हणाले आहेत.