नवी दिल्ली – करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे सीबीएसईची दहावी आणि बारावीची परीक्षा रद्द करावी अशी विनंती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला केली आहे. राजधानी दिल्लीला करोनाचा हॉटस्पॉट बनवण्यापासून वाचवायचे असेल तर या परीक्षा रद्द कराव्या, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
केजरीवाल म्हणाले की, “दिल्लीमध्ये सहा लाख विद्यार्थी सीबीएसईची परीक्षा देणार आहे. तर सुमारे एक लाख शिक्षक परीक्षा घेतील. यामुळे दिल्लीत करोनाचा हॉटस्पॉट तयार होईल. माझी केंद्र सरकारला हात जोडून विनंती आहे की, सीबीएसई परीक्षा रद्द करण्यात यावी.
मुख्यमंत्री केजरीवाल यांनी परीक्षा केंद्रांवर परीक्षा आयोजित करण्याऐवजी दोन पर्यायही सुचवले आहेत. ते म्हणाले की, इंटर्नल असेसमेंट किंवा ऑनलाइन परीक्षेचा पर्याय आहे. यंदा विद्यार्थ्यांना याच पद्धतीने पुढील वर्गात पाठवण्याचा निर्णय घेतला जावा. जगातील अनेक देशांचे उदाहरण पाहत होतो, त्यांनी दुसऱ्या लाटेत परीक्षा रद्द केली आहे. आपल्या देशातील अनेक राज्यांनी बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे.”