सर्रास प्लॅस्टिक विक्री ; मनपाची कारवाई थंडावली
नगर – प्लॅस्टिकच्या वाढत्या वापरामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. सोबतच जनावरे व मनुष्यांसाठी देखील अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. परंतु असे असताना देखील सिंगल युज प्लॅस्टिक’चा खुलेआम वापर करण्यात येत आहे. महापालिकेच्या वतीने गेल्या काही दिवसापूर्वी शहरात प्लास्टिक बंदीच्या डांगोरा पिटवत कारवाईचा धडाका धरला होता. मात्र, ही कारवाई आता थंड झाली असून, शहरात सर्रास प्लॅस्टिक विक्री केली जात आहे. त्यामुळे प्लास्टीक बंदीचा फज्जा उडाला आहे.
राज्य शासनाने मागील वर्षी प्लॅस्टिकच्या वापरावर बंदी लावली होती. अनेक जागी छापेमारी देखील झाली. त्यानंतर प्लॅस्टिकचा उपयोग कमी होईल, अशी अपेक्षा होती. मात्र अद्यापही प्लॅस्टिकचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरूच आहे. सिंगल युज प्लॅस्टिक’च्या विरोधात सुरू असलेली मोहीम प्रभावी ठरली नसल्याचेच दिसून येत आहे. बंदीची गरज का? जलवायू परिवर्तन आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास जगाच्या दृष्टीने मोठा चिंतेचा विषय आहे. असे असले तरी प्लॅस्टिकचा वापर बेसुमार वाढला आहे.
या प्लॅस्टिकमुळे निर्माण होणारे प्रदूषण थांबविणे आणि वाया जाणाऱ्या प्लॅस्टिकचे व्यवस्थापन करणे ही जगाच्या दृष्टीनेच मोठी समस्या ठरली आहे. दरवर्षी कितीतरी लाख टन प्लॅस्टिकची निर्मिती होते. मात्र त्याचे विघटन होत नाही. त्यामुळे सिंगल यूज प्लॅस्टिकचा वापर थांबविण्यासाठी जगभरातील देश कडक धोरण ठरवीत आहेत. सिंगल यूज प्लास्टिक काय आहे? एकदा वापरल्यावर दुसऱ्यांदा वापरात न येणारे अर्थात कचऱ्याच्या डब्यात जाणाऱ्या प्लॅस्टिकला सिंगल यूज प्लास्टिक म्हणतात. यालाच डिस्पोजेबल प्लॅस्टिकही म्हणतात.
या प्लॅस्टिकचा पुनर्वापर करता येतो. याचा वापर बऱ्याचदा दैनंदिन कामात होतानाही दिसतो. प्लॅस्टिकच्या कचऱ्याचे ढीगही वाढत आहेत. प्लॅस्टिकमध्ये असणाऱ्या घातक रसायनामुळे माणसाच्या शरीरात कॅन्सर (कर्करोग) निर्माण होतो. प्लॅस्टिकमध्ये एन्डोक्राईनशी संबंधित समस्या निर्माण करणारे रसायनही असते, ज्यामुळे लठ्ठपणा आणि मधुमेह यासारखे आजार जडतात. प्लॅस्टिक जाळल्यावर कार्बन मोनोऑक्साईड, डायऑक्सिन, हायड्रोजन सायनाईड यासारखे विषारी वायू वातारवणात पसरतात. त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे महापालिकेने मध्यतंरी प्लॅस्टिकच्या विरोधात जोरदार मोहिम सुरू करून विक्रेत्यांवर कारवाई केली. मात्र, आता ही कारवाई थंडावली असून शहरात पुन्हा प्लॅस्टीक विक्री जोरदार सुरु आहे.