नवी दिल्ली – जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळ अशी ओळख असलेल्या बीसीसीआयच्या खेळाडूंकडे होत असलेल्या दुर्लक्षावर आता संताप व्यक्त केला जात आहे. करोना काळात ज्या खेळाडूंना तसेच त्यांच्या परिवाराला खरेच आर्थिक मदतीची गरज आहे, त्यांच्याकडेही बीसीसीआयने सातत्याने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे येत्या काळात त्यांच्या या भूमिकेत बदल होणार का, असा प्रश्न आता खेळाडू विचारत आहेत.
क्रिकेट जगतामध्ये सर्वात जास्त पैसा बीसीसीआयकडे आहे. मात्र, बीसीसीआय आपल्या खेळाडूंनाही मदत करत नसल्याचे दिसून येत आहे. सध्याच्या घडीला काही खेळाडूंच्या घरात करोनाचा शिरकाव झाल्याचे पाहायला मिळत आहे. काही क्रिकेटपटूंच्या कुटुंबीयांना करोनाची लागण झाली आहे. पण बीसीसीआयने अजूनही मदत केलेली नाही. कारण काही खेळाडूंना करोना झालेला नसला तरी त्यांच्या कुटुंबीयांना करोनाची बाधा झाली आहे.
आयपीएलमधील काही क्रिकेटपटूंना करोना झाला आहे. भारताचा फिरकीपटू युजवेंद्र चहलच्या आई-वडिलांना करोना झाला आहे. त्याचबरोबर भारताची महिला क्रिकेटपटू वेदा कृष्णमूर्तीने करोनामुळे आपल्या आई आणि बहिणीला गमावले आहे. आता तर भारताची माजी क्रिकेटपटू श्रावंती नायडूचे आई-वडील करोनाशी लढा देत आहेत. त्यांच्या उपचारांचा खर्च 16 लाख रुपये आला आहे. पण आता यापुढे उपचार करण्यासाठी तिच्याकडे पैसे नाहीत. त्यासाठी तिने तेलंगणा सरकारकडे मदत मागितली आहे. पण बीसीसीआय मात्र यावेळी पुढे येऊन तिला मदत करत असल्याचे पाहायला मिळत नाही. पण आता नायडूच्या मदतीसाठी भारतासाठी महिला बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टाने पुढाकार घेतला आहे.
भारताची माजी क्रिकेटपटू श्रावंती नायडूचे आई आणि वडील हे सध्या करोनाशी झुंज देत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. श्रावंतीने त्यांच्या उपचारांसाठी आतापर्यंत 16 लाख रुपये खर्च केले आहेत. पण आता तिला पुढील उपचारांसाठी आर्थिक मदतीची गरज आहे. तिला सध्याच्या घडीला मदतीची गरज आहे आणि ती करायला हवी, असे ट्विट ज्वालाने केले आहे.
बीसीसीआयला सुबुद्धी येणार का?
बीसीसीआयने आपल्या खेळाडूंसाठी किंवा त्यांच्या कुटुंबीयांसाठी करोनाच्या काळात कुठलीच मदत केली नसल्याचे पाहायला मिळत आहे. वेदा कृष्णमूर्तीने आपल्या आई आणि बहिणीला गमावले आहे. पण बीसीसीआयने तिला मदत करणे तर दूरच, पण तिची विचारपूसही केलेली नाही. त्यामुळे बीसीसीआय येत्या काळात या खेळाडूंसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी मदतीचा हात पुढे करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.